Ad

Friday 30 April 2021

तो चंद्र कुठे

भोगले जे आजवरी
वाटते सुखाचे भास होते
पाहिले जे आजवरी
वाटते ते स्वप्नांचे आभास होते

मेघ तुडुंब भरलेले
डोईवरून निघून गेले
वाटते फक्त सावलीचे
ते फक्त निमित्त होते

होते आकाश हक्काचे
अन चंद्रही होता हवा तसा
पण हाय रे माझ्या दैवा 
आभाळ आलेले होते

रात्र फक्त सरत चालली
चांदण्यांचे व्यर्थ उसासे
आता जरी आभाळ मोकळे
तो भारलेला चद्र कुठे???

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday 26 April 2021

अलगद तिचे होते गाणे...

अनुस्वाराचे कुंकू  भाळी
अन वेलांटीचा घेऊन पदर
कविता माझी लाजवंती
रसिक पुढे होते सादर

वृत्ताची नेसली पैठणी
छंदाची घातली चोळी
अवतरणाची माळ साजिरी
तरी बिचारी साधी भोळी

प्रश्नचिन्हांचे कुंडल कानी
उदगाराचा छल्ला कटी
पूर्णविरामाचा तीळ शोभतो
तिच्या मदन मस्त ओठी

गण मात्रांनी जरी बांधली
डोळ्यात तिच्या मुक्तछंद
खानदानी चाल तिची
कडव्या कडव्यात झाली बंद

शब्दफुलांचा माळून गजरा
कविता माझी अशी लाजते
मिठीत येता येता सुरांच्या
अलगद तिचे गाणे होते
अलगद तिचे गाणे होते

-प्रशांत शेलटकर
 8600583846






जायचच असेल जर तुला....

जायचंच असेल जर तुला
तर हसतमुखाने जा
निरर्थक प्रश्नांच्या फैरीला
माझ्याकडे उत्तर नाही..

जायचंच असेल जर तुला
तर क्लेश घेऊन जाऊ नकोस
आनंदाच्या काही सरीअजून 
बरसायच्या राहून गेल्या आहेत

जायचंच असेल जर तुला
तर ओझं घेऊन जाऊ नकोस
किमान माझ्या आठवणी
माझ्याकडेच सोडून जा

जायचंच असेल जर तुला
मागे वळून सुद्धा पाहू नकोस
मागे मी असेन नसेन
माझं मलाच माहीत नाही

जायचंच असेल जर तुला
तर मनाची पाटी पुसून जा
पाटीवरची अगम्य लिपी
निरर्थक आहे आता तुझ्यासाठी

जायचंच असेल जर तुला
श्वास थोडे ठेऊन जा
अगदीच प्राण कंठाशी आले
तर जवळ असलेले बरे....

-प्रशांत शेलटकर
8600583846



Saturday 24 April 2021

अर्धेमुर्धे..

डीजे दणदणत असतो, वरातीत आपले मित्र बेधुंद नाचत असतात. तसही त्यांना ते सरावाचे असते. डिजेचा 
-हिदम त्यांनी बरोबर पकडलेला असतो..सवाल फक्त आपला असतो..आपण जन्मजात लाजरे-बुजरे असतो. म्हणून आपण कडेला उभे असतो..
     अचानक एखादा मित्र खेचत ओढत वरातीत नाचायला नेतो.आपण कमालीचे ओशाळतो...काही केल्या तो हिदम आपल्याला पकडताच येत नाही. आपण कसेतरी हातपाय झाडत राहतो..सगळे मस्त एन्जॉय करत असतात.आपल्याला उगाच कॉम्प्लेक्स येतो..वरात संपते, डीजे थांबतो. आपले मित्र फुल्ल एन्जॉय करून दमलेले असतात.आपण वरात संपली म्हणून खुश...
    आयुष्यात असच होत काही वेळा..आपण अपघातानेच जन्माला आल्यासारख वाटत राहतं..आपले सूर आपल्याच आयुष्याशी जुळत नाहीत..सतत काहीतरी निसटून गेल्यासारख वाटत राहतं..आपण हातपाय मारत रहातो.. इतरांशी सूर जुळवत राहतो..पण कुठेतरी विसंगती राहून जाते.आपण मग त्या विसंगतीमधील संगती शोधण्याचा प्रयत्न करत राहतो..जिगसॉचे तुकडे जुळवत राहतो...पण ते जुळणारच नसतात ..त्यातला एक तुकडा मिस आहे ते कळतच नाही आपल्याला.. परफेक्शनचा ध्यास लागला की अर्ध्यामुर्ध्या चित्रातले आनंद पण दुर्मिळ होतात..
      तस पाहिले तर आपले हे अर्धेमुर्धे आयुष्य आपल्याला उमगत नाही हेच खरं

-प्रशांत शेलटकर
 8600583846
     

Sunday 18 April 2021

स्वर्गात जुळलेल्या गाठी

अस म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच जुळून आलेल्या असतात..आणि हे माणसाच्याच बाबतीत असतं अस ही नाही पदार्थांच्या बाबतीतही शक्य आहे.
बघा ना मिसळीची जोडी पावाशिवाय जमुच शकत नाही.तिखट मिसळीचा पावा सारखा सौम्य जोडीदार शोधूनही सापडणार नाही..पावाची जोडी उसळीशीही जमते पण ती खुलत नाही...ती घरच्यांनी जमवून दिलेल्या लग्नासारखी वाटते..अगदी तडजोड म्हणून मिसळ-पावाची  लग्नगाठ मात्र जणू स्वर्गातूनच जुळून आलेली..
        बासुंदी-पुरी या खरतर जिवलग मैत्रिणी..दोघींना एकमेकींशिवाय करमतच नाही.. पण जोडीदार म्हणून पुरीला कूर्माच शोभून दिसतो.. कुर्मा-पुरी ही जोडी तशीच स्वर्गातूनच गाठ बांधून आलेली..बिचारी बासुंदीला जोडीदारच नाही...ती अविवाहितच राहते तिला तडजोड करायलाच आवडत नाही..जिलेबीच एक बर असत ती स्वतः सुंदर असली तरी तिला गर्व नाही ..मठ्ठ असला तरी मठ्ठयाशी ती सूत जुळवते आणि मठ्ठा-जिलेबीचा संसार सुखाचा होतो..
       व्यंजनाच्या दुनियेत वडा-पाव म्हणजे ही दोस्ती तुटायची न्हाय या कॅटेगरीतले..दोघांची जोडी लय फेमस..पण या वड्याला पण जोडीदारच नाही..कधीतरी लिव्ह अँड रिलेशनशीप मध्ये राहतो तो चटणीबरोबर..पण ते नातंच कोणाला फार पसंद नाही..मग कधीतरी सांबाऱ्यात उडी मारून जीव देतो बिचारा..
      पाव बिचारा अगदी साधा त्याचे नखरे नसतात..त्याच्याकडे चवींची मिजास नसते..तो फक्त वयोमानानुसार शिळा होतो..त्याच्या या सालस स्वभावामुळे त्याला मित्र -मैत्रिणी खूप, वडा-पाव,मिसळ-पाव, उसळ-पाव, भुर्जी-पाव, अंडा-पाव, पाव-भाजी कोणाशीही पटत त्याचे...
      व्यंजनाच्या गोतावळ्यात एक समाजसेवी जोडपे राहूनच गेले...झुणका-भाकर...झणझणीत झुणक्याला गरिबाघरची लेक भाकरीच सांभाळून घेऊ शकते..झुणका स्वभावाने तिखट असला तरी भाकरी त्याला सांभाळून घेते...हे जोडपं गरीब आहे..आणि त्याना एक मूल देखील आहे बरं का कांदा नावाचं....
     सगळयांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या..त्या तशाच शोभून दिसतात नाही का....

प्रशांत शेलटकर
8600583846
    

Wednesday 14 April 2021

लग्न

लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमात पडून मग लग्न करणे
आणि अरेंज मॅरेज म्हणजे लग्न करून मग प्रेमात पडणे.
लव्ह मॅरेज मध्ये आधी ओळख होते मग प्रेमात पडण होत ..मग सगळे योग जुळून आले तर लग्न होत.
अरेंज मॅरेज मध्ये आधी लग्न होत,मग ओळख होत जाते मग प्रेम फुलत जातं.
लव्ह मॅरेज म्हणजे वेरूळच कैलास लेणे आधी कळस मग पाया..अरेंज मध्ये आधी पाया मग प्रेमाचा कळस..
लग्न कोणत्याही पद्धतीचे असो ते लोणच्यासारख असत..जसे मुरत जाईल तसे त्यातली लज्जत वाढत जाते.
    केवळ व्यवहार बघून केलेली लग्न टिकत नाहीत आणि केवळ आंधळेपणाने केलेली लग्नही टिकत नाहीत
खरं तर वैवाहिक जीवन परिपूर्ण असूच नये..त्यात कुठेतरी अपुरेपणा असावाच.हाच अपुरेपणा एकमेकांना धरून ठेवतो. दोघेही एकमेकांवर अवलंबून असायला हवेतच.. जिगसॉच्या तुकड्यांना परिपूर्ण आकार असते तर त्याला काही अर्थच नसतो..दोन्ही तुकडे एकमेकांशी फटकूनच वागणार पण तेच जर वेडेवाकडे असले तर कुठेतरी ते एकमेकांशी जुळणारच..एकमेकांना धरून राहणारच..
     -प्रशांत शेलटकर
      8600583846
     
    

Monday 12 April 2021

पुराणातील वांगी (की वानगी ?)



पुराण कथा वाईट नसतात,त्यातला सदुपदेश महत्वाचा असतो.नव्या पिढीला त्या भाकड कथा वाटतात. वाटणारच, कारण त्या लॉजीकली पटत  नाहीत. आजची पिढी प्रश्न विचारणारी आहे.तिला तिच्या कलाने समजून सांगावे लागते. 
      देवबाप्पा येईल आणि कान कापील हे ऐकून घेणारी ही पिढी नाही.म्हणून मुळात पालकांना पुराण कथांमधील मर्म कळलं पाहिजे. पुराण कथा इतिहास म्हणून सांगू नये.त्या दृष्टांत कथाच असतात. कथेच्या माध्यमातून जीवन मूल्य रुजवणाऱ्या या कथा मुलांपर्यंत त्यांना पटेल अशा पध्दतीने गेल्या तर मुलं ऐकून घेतात. 
     मुळात लक्ष वेधून घेण्यासाठी, मनोरंजनाचा मसाला वापरून जीवन मूल्य रुजवण्यासाठी पुराण कथांची निर्मिती झाली.लहानवयात कथा ऐकताना मन त्या कथांमधील चमत्काराकडे आकर्षित होत असले तरी प्रौढवयात त्यातील मूल्य लक्षात राहतात हे त्या पुराण कथांचे यश म्हणावे लागेल. 
    प्रामाणिकपणा,खरे बोलणे,गरिबीला न लाजणे, दान करणे, शिक्षण घेणे, याचे अनौपचारिक शिक्षण या पुराणकथा देत असत.मूल्यशिक्षण देण्याचे मध्यम म्हणून पुराणकथा काम करत होत्या. आजच्या पिढीचे ते माध्यम वेगळे असू शकते.आजची पिढी स्मार्ट आहे.कदाचित तिला या कथांची गरजच लागणार नाही.तुम्ही सांगायला गेलात तर ती प्रश्न विचारून तुम्हाला हैराण करेल.त्याची उत्तर तुमच्याकडे असतीलच असे नाही, अशावेळी मूल्य शिक्षणाचे माध्यम हे तुम्ही स्वतः असू शकता, शेवटी मूल तुम्हालाच फॉलो करत असते.
      पुराणातील वांगी पुराणात म्हणायची पद्धत असली तर मुळात तो शब्द वांगी असा नसून वानगी असा आहे.वानगी म्हणजे उदाहरण ,दाखला, जेव्हा आयुष्यात प्रश्न उभे राहतात तेव्हा पुरांकथामधील नायक कसे वागले होते याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन त्या प्रमाणे वागणे म्हणजे पुराणातील वानगी, या वानगी चे वांगी होऊन त्याचे भरीत कधी झाले ते कळलेच नाही.
       
      कालाय तस्मै नमः

-प्रशांत शेलटकर
 8600583846

जिथे....

जिथे मुद्दलच नाही
तिथे व्याज कुठून
जिथे  सागर नाही
तिथे गाज कुठून

जिथे चंद्रच नाही
तिथे पौर्णिमा कुठून
जिथे इंद्रच नाही
तिथे अप्सरा कुठून

जिथे चंदनच नाही
तिथे गंध कुठून
जिथे वळीव नाही
तिथे मृदगंध कुठून

जिथे उत्पत्तीच नाही
तिथे लय कुठून
जिथे संपत्तीच नाही
तिथे भय कुठून

जिथे स्वरच नाही
तिथे गीत कुठून
जिथे मनच नाही
तिथे मनमित कुठून

जिथे कान्हाच नाही
तिथे पान्हा कुठून
जिथे हिरकणीच नाही
तिथे तान्हा कुठून

जिथे तू नाहीस 
तिथे मी कुठून
जिथे मीच नाही
तिथे तू कुठून

-प्रशांत शेलटकर
 8600583846


Friday 9 April 2021

जरा थाम्ब

अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
उगाच का लावतोस
अक्कलेचा दिवा..

कळतेच सर्व तुला
आव उगा का आणतो
पितळेला उगाच का
भाव सोन्याचा देतो
का चालला तू असा
जिथे नेईल हवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा

इथे पूर्ण सत्य 
ना कधी कुणा कळले
तरी वाटते तुला
सर्व तुलाच कळले
क्षणभर देई रे
तुझ्या मनाला विसावा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा

कुणी भलतेच काही
पुस्तकात लिहितो
कुणी फेसबुकीं
काही पोस्टून जातो
कुणी देतो रे
निखाऱ्याना हवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा

आंधळी निष्ठा रे
कुणावर नसावी
आपली आपणाशी
बुद्धी स्वतंत्र असावी
मनाच्या गुलामीला
ना  कसलीही दवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा

आज काल आदरणीय
कुणी राहिले नाही
आज काल स्पृहणीय
काही राहिले नाही
देवही आजकाल 
करतो देवाचाच धावा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा

नेते आज जे बोलले
ते आजच विरून जाते
भांडणाला कार्यकर्त्यांना
फक्त निमित्त मिळते
लबाड नेत्यांचा रे
ओळख कुटील कावा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा

मतां मतांच्या लोंढ्यात
असा वाहून जाऊ नको
बुद्धीचा काठ कधी 
सोडूच नको.
कळेना ना कुणाची
कधी पालटेल हवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा

अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
उगाच का लावतोस
अक्कलेचा दिवा..

-प्रशांत शेलटकर
8600583846

Monday 5 April 2021

सासू-सून

सासू-सून

नाते सासू-सुनेचे
जणू ढाल-तलवार
एक फक्त झेलते
दुसरी करते वार

काडीकाडी जमवून
एक विणते घरटे
पती आणि मुलांचे
एक विश्व तिचे होते

माहेरची आठवण
ती जपते डोळ्यात
माहेरच्या साडीला
लाखाची हो किंमत

ती असते तिच्या
किचनची हो राणी
अगदी चमच्याची हो
असते स्पेशल कहाणी

एके दिनी परंतु हो
येई दुसरीच परी
सुनेचे मग हिला
कौतुकच भारी

नव्याचे नऊ दिन
भर्रकन सरून जाती
नात्याचे मग नवेल्या
रंग फिके पडती

नव्या सूनबाईला मग
हवे वाटे स्वराज्य
नव्या नव्या विटेला
हवे नवेच मग राज्य

किचन मधली हवा 
मग हळूहळू तापे
स्वामीत्वाचा लढा मग
शिगेलाच पोचे

संसारासाठी म्हणे मी
काडी काडी केली
सुनेला म्हणे माझ्या  
माझी किंमतच नूरली

सून म्हणे सासूबाई
आता तुमचं राहुद्या
आम्हालाही  जरा आता
आमचा संसार करुद्या

दोन बायामध्ये होतो
असा जोरदार तंटा
दोघीमध्ये नवरोबा
काय करणार घंटा

आई म्हणते पोर माझा
बायकोचा झाला बैल
माझ्या समोर रुबाब करतो
बायकोला सोडतो सैल

बायको म्हणते नवरा माझा
आईच कुकुल बाळ
आई पुढे शिजत नाही
याची काही डाळ..

सासू-सुनांच्या तंट्याचा
मी काढला लसावी
प्रश्न एकच असतो
सम्राज्ञी कोण असावी?

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846




डोह

डोह


खोल खोल डोह
त्याचे गहिरे अंतरंग
शांत त्याच्या काठावर
ना कसले तरंग

खोल खोल डोह
त्याचा थांग लागत नाही
तोही मनातले काही
कधी बोलतच नाही

खोल खोल डोह
आत गहिरे खोल पाणी
घनगर्द तळाशी त्याच्या
साचली वेगळी कहाणी

खोल खोल डोह
त्याला ओझे होई पान
तरंगाची भाषा सांगे
जणू डोहाचेच मन

खोल खोल डोह
तळ त्याचा दिसेना
डोहाच्या वेदनेचा
थांग कोणा लागेना

खोल खोल डोह
त्याला एकांताचा शाप
डोह भोगतो जणू
गत जन्मीचे  पाप

-प्रशांत शेलटकर
8600583846










Friday 2 April 2021

चौविसातला एक





पोटाचा झाला ग तुंबा
खेळ ना सखे तू झुंबा

वाढली किती ग चरबी
बेताने सगळं ग खा की

टाकु कसे? म्हणून खाऊ नको
आजाराला बोलावणे धाडू नको

सकाळी थोडे  उठ लवकर
अंगणातच थोडं पळ भरभर

स्वयंपाक-पाणी ,धुण भांडी
याला कशी  मारावी दांडी

पण हे सगळे ग एगझर्शन
एगझरसाईझला ना ऑप्शन

स्लिमट्रीम म्हणजे नव्हे फिटनेस
खाण सोडून येईल ना विकनेस

पाव, बिस्कीट ,टोस्ट आणि बटर
तब्बेतीसाठी नाहीच बेटर

खाण्यात असुदेत फळे लोकल
नको चायनीज हक्का न्यूडल

भांडू नको  कायम हसत राहा
रुसू नको  कायम हसत राहा

चौविसातला एक देऊन बघ
स्वतःसाठी एक तास जगून बघ

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday 1 April 2021

वर्णव्यवस्था

वर्णव्यवस्था ही नैसर्गिक आहे,जातीव्यवस्था ही कृत्रीम आहे.वर्ण म्हणजे केवळ रंग नव्हे वर्ण म्हणजे वृत्ती.वृत्ती या उपजत असतात.त्या जन्मावर आधारित नसतात.मूलतः ज्ञान संपादन करणे आणि दान करणे ऐहिक गोष्टींविषयी फार ओढा नसणे म्हणजे ब्राह्मण,मूलतः अंगात शौर्य,पराक्रम, सत्तासंपादन करून ऐहिक भोग घेण्याची वृत्ती म्हणजे क्षत्रिय,मूलतः व्यापार करून धन संपादन करण्याची वृत्ती म्हणजे वैश्य ,आणि मूलतः सेवा करण्याची वृत्ती म्हणजे शूद्र...शूद्र म्हणजे क्षुद्र नाही..मुळातच यात कोणी उच्च आणि नीच नसतेच..उपजत वृत्तीना तुम्ही उच्च नीच ठरवणार तरी कसे? ती बाय डिफॉल्ट आलेली असते.
      जागतिक स्तरावर काही उदाहरणे नक्कीच सांगता येतील . वृत्ती म्हणून बघा.
       आइन्स्टाइन - ब्राह्मण
       नेपोलियन- क्षत्रिय
       बिल गेट्स- वैश्य
       मदर तेरेसा- शूद्र

     वर्णव्यवस्था कधीच वाईट नसते.ती निसर्गनिर्मित आहे.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही त्या वृत्तीना दिलेली नावे आहेत. मग समान त्या वृत्तीचे समुदाय बनत गेले.त्यानुसार व्यवसाय निर्माण झाले मग स्वतःच्या समुदायाचे हित सांभाळण्यासाठी जाती निर्माण झाल्या. पुढे त्याच्यात उच्चनीच निर्माण झाले ,संघर्ष निर्माण झाले..आणि हे जगात सगळीकडे झाले.
    व्यवसायिकांना जशी आपल्या व्यवसायात स्पर्धा नको असते तशीच तत्कालीन जातीव्यवस्थेत पण स्पर्धा नकोशी झाली.मग एका जातीतून दुसऱ्या जातीत जाणे अवघड झाले.हुशार लोकांनी त्याला धर्माची चौकट दिली.स्वतःच्या समुदायाचे वेगळेपण जपण्यातूनच श्रेष्ठत्वाची भावना निर्माण झाली. पुन्हा एकदा हे सर जागतिक स्तरावर झाले.
     आताही नव्या जाती निर्माण होत आहेत.कापड विक्री करणारे दुसऱ्या ला त्यांच्या धंद्यात प्रवेश करू देत नाहीत.राजकीय नेते आपल्या बिरादारीच्या बाहेर नेतृत्व देत नाहीत..एखाद्या क्षेत्रात विशिष्ठ उद्योग समूहाचीच मोनोपॉली असते म्हणजे एक नवीन जातच असते ना..?
भांडवलशाही,साम्यवाद,समाजवाद या नवीन जाती बनू पाहत आहेत. स्वतःच वेगळपण जपण्याची वृत्ती मानवजातीच्या जन्मापासून अंता पर्यंत कायम राहील..फक्त त्याच्या चौकटी बदलत राहतील... वर्णव्यवस्था नैसर्गिक आहे ती राहणार..जातीव्यवस्था vertical मोड वरून  horizontal मोड ला गेली तरी खूप झालं...

प्रशांत शेलटकर
8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...