Ad

Saturday 29 January 2022

सासूबाईंसाठी काहीटिप्स...

सासूबाईंसाठी काहीटिप्स ...

1.नवीन सुने बद्दल घाई घाईने मत बनवू नका. खूप स्तुती आणि खूपच टीका अस करू नका. आधी तिचा अंदाज घ्या

2. सून घरात येताना खूप सारे पूर्वग्रह घेऊन येते सासू म्हणजे त्रास देणारीच असते असे पूर्वग्रह तिचे जवळचे नातेवाईक तिच्या मनात भरवत असतात, उलट्या बाजूने सासू म्हणूनही स्त्रिया वेगळाच विचार करतात आता ही आली म्हणजे माझ्या मूलावर ती हक्क गाजवणार , मला किचन मधून आणि मुलाच्या मनातून हद्दपार करणार वगैरे..तेव्हा दोन्ही बाजूनी पूर्वग्रह टाळा.

3.आपल्या सुनेविषयी इतरांना  सांगत बसु नका. आणि इतरांचे काहिही ऐकू नका. तिचे गुण सांगताना चार चौघात सांगा पण काही चुकलं तर तिच्या पाठीवरून हात फिरवून एकांतात प्रेमाने सांगा.ओठांत एक आणि पोटात एक अस करू नका

4. शेजारी-पाजारी, आपली लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी यांना आपल्या कुटुंबात ढवळाढवळ करायला सांगू नका.. ठिणग्या तिकडेच पडतात. आपल्या सुनेला सर्वात जवळचे आपणच वाटलो पाहिजे आणि आपणही मुलीपेक्षा सुनेला जवळ केलं पाहिजे.कारण आपल्या म्हातारपणात मुलीपेक्षा सून जवळ असते

5 आपल्या घराण्याचे रीती रिवाज तिला हळुवार पणे समजून सांगा. त्यातला आनंद घ्यायला शिकवा पण अजिबात सक्ती करू नका सक्तीने काही होत नाही. रितिरिवाजापेक्षा तुमच्यातले नातेसंबंध महत्वाचे, तिच्या माहेरचे काही  रीती रिवाज असतील तर ते तिला पाळू द्यावेत. आमच्यात अस चालत नाही म्हणून सांगू नका

6 तिच्या माहेरचा चुकूनपण अपमान करू नका,तसेच सासर आणि माहेर यांची तुलना करू नका.आपल्या सुनेची इतरांच्या सुनेशी तुलना करू नका प्रत्येक जण युनिक आहे

7 टोमणे कधीच मारू नका, सगळ्या नात्याची वाट लावणारे ते घातक अस्त्र आहे. 

8.अति कौतुक पण करू नका. जी आहे जशी आहे तस तिला स्वीकारा. सर्वगुणसंपन्न सून किंवा सासू ही फक्त कल्पना आहे. दोष असतातच फक्त ते स्वीकारा

9. किचन वरचा हक्क हळूहळू सोडा. तिने केलेल्या पदार्थांचे कौतुक करा. काही कमीजास्त असेल तर ते सौम्य शब्दात सांगा..उदा. मीठ कमी असेल तर " अग मीठ थोडं कमी वाटतय का ग " अस हसून सांगा..मीठ कमी झालंय अस रुक्षपणे सांगू नका.तिने केलेल्या पदार्थांना नावे ठेऊ नका तुम्ही घरात सून आणली आहे मधुरा रेसिपीचे पुस्तक नाही.

10.  नवीन सून आल्यानंतर तिला एक सांगा माझं काही चुकलं तर मला सांग तुझं काही चुकलं तर मी तुला सांगेन पण कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांच्या चूका बाहेर सांगायच्या नाहीत.

11. तुमचा मुलगा हा आता तिचा नवरा आहे हे लक्षात घ्या. त्याला काय आवडत काय नाही हे सुनेला सांगत बसू नका . त्याला तोंड आहे तो सांगेल. त्यालाही एक सांगा की बायकोला अजिबात नावे ठेवायची नाहीत. ती नवीन आहे आपण सांभाळून घ्यायला हवं. मुलाने कधी बायकोचे कौतुक केलं तर त्यात तुम्ही भरच घाला बघा नातं कस फुलून येत...
     येणाऱ्या सुनेला माहेर विसरायला लावणं हे सासूबाईंचे खरे कौशल्य....


सूनबाईसाठी टिप्स लवकरच लिहितोय...☺️☺️☺️

प्रशांत शेलटकर
8600583846

सूनबाईंसाठी टिप्स

सूनबाईंसाठी टिप्स...

1. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा नवीन माणसे आणि वातावरण यांच्याशी जुळवून घेणे कठीण असते.म्हणून लग्न ठरवताना  मुलगा किती कमावतो हे पाहताना त्याचा आणि त्यांच्या घरच्यांचा स्वभाव कसा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

2. लग्नापूर्वीच सासू ही त्रास देणार छळ करणार असे गृहीत धरू नये. मनाची पाटी कोरी करून सासरी प्रवेश केल्यास अडजेस्ट होणे सोपे जाते

3 सासरी सर्वांचे मन जिंकण्याच्या नादात स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेऊ नये. न पटलेली गोष्ट शांतपणे ,आणि ठामपणे का करणार नाही ते स्पष्ट शब्दात सांगावे.चेहरा हसरा ठेवूनही नकार देता येतो. न पटणाऱ्या गोष्टी करत गेल्यास मनातल्या घुसमट होते आणि तीच पुढे कौंटूंबिक कलहाला आमंत्रण देते.

4.पूर्वग्रह ठेऊन सासुकडे पाहिलं तर सासू म्हणजे त्रास वाटू शकतो. अपवादात्मक सासवा सुनेला मुलगी मानतात. म्हणून सासु मध्ये आई पाहू नये आणि आईची तुलना सासूबाईंशी करू नये

5. सासूबाईंना किचन मधून बेदखल करू नये. तिने काडी काडी जमवून संसार उभा केलेला असतो त्याचा मोह लगेचंच जाईल असे नाही. उलट त्यांच्या मनात मुलाच्या मनातील आईचे महत्व कमी होईल याची भीती वाटत असते.

6. आपला नवरा हा कुणाचा तरी मुलगा आहे हे लक्षात ठेवावे.त्याच्यावर प्रेम करा पण आई हे त्याचे पाहिले प्रेम आहे हे लक्षात ठेवा..

7.जेवणाचे मेनू ठरवताना सर्वांची आवड लक्षात घेऊन मेनू ठरवा. स्वयंपाक करताना नवरा आणि मुलांना पण सहभागी करून घ्या.

8. जे काही बोलायचं असेल ते स्पष्ट आणि नम्र भाषेत सांगा. पण टोमणे चुकूनही मारू नका

9. कितीही जवळची असली तरी मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप असू नये. सासू म्हणजे शत्रूपक्ष नाही.

10 संसारात काही समस्या उदभवल्यास त्याचे सोल्यूशन माहेरी शोधू नये. स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवा.

नवरोबां साठी  टिप्स लवकर लिहितोय....

प्रशांत शेलटकर
8600583846

दिलेलं दान कळावच

दिलेलं दान कळावच...

असा एक वाक्प्रचार आहे की उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला कळता नये.. जेव्हा आत्मिक समाधानासाठी दान केलं जातं तेव्हा ते कोणालाही कळू नये हे बरोबर... पण जेव्हा सार्वजनिक स्तरावर मदत केली जाते तेव्हा ती  इतरांना कळली पाहिजे कारण त्यातून इतरांना प्रेरणा मिळून मदतीचा ओघ वाढतो..
    दान आणि मदत यात फरक आहे. माझ्याकडील जास्त मी दुसऱ्याला देतो तेव्हा ते दान होते . मदत ही कर्तव्य भावनेने केली जाते. दान गुप्त असावे कारण दानाचा अहंकार होऊ नये 
      मदत करताना पण अहंकार असू नये..देणारा मग्रृर असू नये आणि घेणारा लाचार..मदत देताना आपण समाजाचे कर्ज फेडत आहोत अशी भावना असावी...
      सर्वांनीच आपल्या पुरत पाहिलं असत तर शाळा ,कॉलेज ,हॉस्पिटल उभी राहिली नसती. मी जन्माला आलो एकट्याने प्रगती केली असे काहीही नसते.. सर्वांचाच  कळत नकळत हात भार आपल्याला लागलेला असतो.
     मदत अगर दान हे पुण्य मिळावे म्हणून करायचे नसतेच. ज्याच त्याला देणं असत बस्स...

-प्रशांत

Wednesday 26 January 2022

लेख- प्रजासत्ताक

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने....

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...💐

विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून संविधान निर्माण झाले आणि आजच्या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो...
    विविध धर्म,परंपरा,परस्परविरोधी विचार धारा प्रजासत्ताकच्या एका धाग्याने बांधल्या गेल्या. तसे पाहिले तर या देशात परस्परविरोधी विचारांचा आदर आणि सन्मान करायची परंपरा नक्कीच आहे. काही वेळा टोकाची कटुता निर्माण होते हे सत्य असले तरी जगा आणि जगू द्या या तत्वाचा जीन्स आपणा भारतीयांमध्ये आहे हे नाकारून चालणार नाही.
      परंतु सद्यस्थितीत हे कुठेतरी कमजोर होत जातंय अस वाटतं. सगळी माणस समान आहेत यापेक्षा  परस्परातील असमानता समान आहे  हे जास्त करेक्ट विधान आहे. शारीरिक,बौद्धिक असमानता असूनही आपण माणूस आहोत हे आपल्यातला समान धागा आहे. डावे-उजवे,प्रतिगामी-पुरोगामी, अभिजन -बहुजन ही वर्गवारी जगभरात सगळीकडे असली तरी  असे काटेकोर वर्ग कधीच नसतात. मेंदूत खिळ्यासारखे ठोकून घट्ट बसवलेले विचार बाजूला केले तर , डाव्यांमध्ये उजव्यांचा अंश,उजव्यांमध्ये डाव्यांचा अंश, प्रतिगामी बहुजन आणि पुरोगामी अभिजन अशी सरमिसळ असतेच. 
      गणिताचे लॉजिक समाजशास्त्राला लागत नाही.म्हणून माणसांचे विभाजन काटेकोर करता येत नाही.ते जात,धर्म आणि पंथाच्या सहाय्याने नक्कीच करता येते. त्यात सोशल आणि प्रिंट मीडिया मुळे आणखी एक वर्ग निर्माण झालाय. तो म्हणजे फॉलोअर्स. भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या नेत्यांचे फॉलोअर्स 
त्यात गांधीवादी,आंबेडकर वादी, सावरकर वादी,  वर्तमानात मोदी,राहुलगांधी,शरद पवार, ममता बॅनर्जी , दक्षिणेत अभिनेत्यांचे फॉलोअर्स, आंदोलन  जीवी नेत्यांचे फॉलोअर्स  अगदी लेखकांचे पण फॉलोअर्स..
      कोणाच्या विचारांचे अनुयायी असणे वाईट मुळीच नाही. अनुयायांच्या सामूहिक शक्तींनी कित्येक विधायक आणि विघातक दोन्ही प्रकारची  कामे केलेली आहेत. समाज घडवलेला आणि बिघडवलेला पण आहे.
    परस्परविरोधी विचारसरणीचे अनुयायी असणे ,त्यांच्यात वैचारिक संघर्ष असणे ही आपली हजारो वर्षांची परंपरा आहे, अशा परस्परविरोधी विचारामुळेच आपला सामाजिक समतोल टिकून आहे.विधायक टिकेने समाजातल्या विघातक गोष्टी कमी होतात पण सध्या कुठल्यातरी एका समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते हे निखालस चूक आहे. केवळ समाजच नव्हे तर काही वेळा लिंगभेदही असतो. अर्थात लिंगभेद म्हटलं की फक्त स्त्रीवरचा अन्याय डोळ्यासमोर येतो अर्थात ते प्रमाण जास्त असल्याने ते साहजिक आहे परंतु   पुरुष म्हणून होणारे अन्याय हे नगण्य आहेत असे म्हणता येत नाहीत.
      असो , विषय असा आहे की एकाच वेळी मी गांधीवादी,आंबेडकर वादी,सावरकर वादी असू शकत नाही का? माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटलेले गांधी, सावरकर,टिळक आंबेडकर, शाहू महाराज स्वीकारण्याचे स्वातंत्र्य मला असावे की नसावे.? की कोणाचा तरी एक शिक्का मारून घेऊन मी कोणाच्या तरी कळपात शिरावे.? मी अभिजन नसलो तर मी बहुजन असावेच का?आणि मी बहुजन नसलो तरी स्वतःला अभिजन म्हणवून घेण्यात धन्यता का मानावी? देशात नवीन जातीव्यवस्था तर निर्माण होत नाहीयेना? पुरोगामी लेखनाच्या नावाने कोणी नवीन मनुस्मृती तर लिहीत नाही ना?
       प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मला हे प्रश्न पडले आहेत. कदाचित त्याची उत्तरे आंबेडकर, सावरकर,शाहू, महात्मा गांधी,पेरियार, बुद्ध,कृष्ण विवेकानंद ,चार्वाक, कणाद देतीलच कारण परस्परविरोधी विरोधी असले तरी त्यांचा ल.सा.वि. एकच आहे तो म्हणजे भारतीयत्व....

पुन्हा एकदा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846
 रत्नागिरी...

Thursday 13 January 2022

बोलू आनंदे...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बोलू आनंदे.....

गोड बोलूया पण सत्य बोलूया
मागून नको पुढ्यात बोलूया
टोमणे नकोच ते थेट बोलूया
रडत रडत नको हसत बोलूया

कौतुकाचे चार शब्द बोलूया
शिव्या शाप अभद्र टाळूया
डोळ्यात थेट पाहून बोलूया
वेळ पाहून ना खेळ मांडुया

नेमके , स्पष्ट, प्रभावी बोलूया
कुजकट हलकट शब्द टाळूया
जिभेवर नेहमी साखर ठेवूया
अन डोक्यावरती बर्फ ठेवूया

नित्य शुभंकर मंगल बोलूया
पर कल्याणाचे बोल बोलूया
वैखरी आपुली शुद्ध करूया
 संक्रांतीला संकल्प करूया

शुभम भवतु....🍁🍁🍁

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Sunday 9 January 2022

लाडकी

लाडकी....

इतकीही छान दिसू नकोस ग
दर्पणही होईल तुझ्यावर फिदा
लिपस्टिकही किती लोचट ग
ओठांवर फिरते कित्येकदा..

वाटते व्हावे कंगवा हस्तिदंती
अन केसात तुझ्या गुंतून पडावे
वाटते कधी व्हावे बिंदी अन
भाळावर तुझ्या मिरवीत बसावे

कधी वाटते मला स्वतःला
 रसरशीत सफरचंद व्हावे
व्रण तुझ्या शुभ्र दातांचे
अंगोपांगी सहर्षे मिरवावे

नथ तुझी व्हावे का?
नको नकोच ग कधी
फक्त सणावरी मिरवणे
नको नकोच कधी

होईन चमकी  छानशी
ते एक असते बरे..
सहवास लाभतो नित्य
हे एक गोड सत्य खरे..

होईन मी एक मस्त चाप
सांभाळीन तव केशसांभारा
हलकेच धरून ठेवीन मी
जर  माळलास कधी गजरा

जरी सखे लाडकी तू
लाडिकपणा पुरे आता
इतकी सजू नको ग
जीवच जाईल आता माझा

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...