Ad

Sunday 31 December 2017

नातं

ज्या गावाला जायचंच नाही
त्याचा पत्ता विचारुच नये...
जे नातं तोडायचंच आहे
ते कधी जोडूच नये...

दूर जर जायचेच आहे..
तर जवळ कधी येऊच नये..
विझवयाचीच असेल ज्योत जर
ज्योतीला ओंजळ धरूच नये...

सोडायचीच असेल साथ जर
उगाच हात धरु नये.
आणि एकदा धरला हात तर
शेवटपर्यंत सोडूच नये...

बोलायचंच नसेल कुणाशी
तर नजरेनंही बोलूच नये...
कितीही रडलो आतून तरी
डोळ्यात पाणी  आणू नये...

डोळे भरले आपले तरी
एक मात्र होऊ नये....
पाणी तिच्या डोळ्यात
देवा कधी येऊच नये...

-प्रशांत शेलटकर

सरत्या वर्षाला निरोप देताना

सरत्या वर्षाला निरोप देताना..

आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन क्षणांमधली अखंड धडपड...मग ही धडपड आनंदमय का करू नये...देव आपल्याला वर्ष नावाचं गुलाबाचं फूल देतो...आता गुलाब म्हटले की काटे असायचेच...काट्याशिवाय गुलाब असतं का?..तसेच सरत्या वर्षात काही आठवणी गोड तर  काही कडू असणारच...दोन्ही स्विकारायला हवं...नाती जपायला हवीत..
    नातं कोणतेही असो,नातं तुटणं हे वेदना देणारं असतं...
नाती तुटतात कारण आपण एखाद्याच वागणं चूक आहे की बरोबर एवढच पाहतो...ते नैसर्गिक आहे का ते पहात नाही...नातं कस जपायचं हे उमजलं की आयुष्य म्हणजे सुंदर प्रवास वाटतो...
       सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष उगवतीच्या क्षितीजावर दस्तक देताना एक संकल्प जरूर करुया...
        "एकमेकांना जपुया"
बस्स इतकच....बोलायच होत

....प्रशांत शेलटकर

Tuesday 12 December 2017

राधे...!!!




    पारध्याच्या  तीराने  डाव्या पायाच्या अंगठ्याचा छेद घेतलाय... वेदनांनी  परिसीमा गाठली आहे... कृष्ण नावाचं चेतन देहाच्या सीमा ओलांडून अनंताकडे झेप घेतय... अशा प्रस्थान समयी फक्त तूच आठवतेस राधे...

    राधे अजाणतेपणी तूझ प्राक्तन अनयशी ,तुझ्या नव-याशी बांधल खरं... पण नियतीला ते मान्य नव्हते... राधा फक्त या कृष्णासाठीच जन्मली होती... राधे लोकांना फक्त आपली रासक्रीडा दिसली... पण राधेच्या तनामनात रूजलेला  कान्हा कधी दिसला नाही... अनयला तर नाहीच नाही...

    राधे लोकांना कृष्णाच्या सोळासहस्त्र नारी दिसल्या... पण गोकूळ सोडल्यानंतर माझी बासरी मूकी का झाली ते कुणालाच समजल नाही...

    राधे गोकुळ सोडताना तू निरोप द्यायला पण नाही आलीस... योग्य केलस... कारण कान्हाला थांबवण्याची ताकद फक्त तूझ्यात होती... पण तू आली नाहीस... कारण माझं जीवन ध्येय फक्त तूलाच माहीत होत...

    राधे मी गोकूळ सोडलं आणी तू हे जग सोडून गेलीस... माझं नाव घेतं... राधे त्यानंतर मी कधीच बासुरी ओठांना लावली नाही... तीचे सूरच हरपले होते...

    राधे आता काही क्षण उरलेत... तूझा गौरमुखचंद्र अगदी स्पष्ट दिसतोय... तेच ते यमुनेच्या डोहासारखे... गहिरे डोळे... ते घनगर्द मेघासम गालावर दाटून येणारे केस सारं काही स्पष्ट  दिसतयं...

    आणि हे काय?... राधे तूझ्या डोळ्यात पाणी... नको राधे... नको... आपल्या मिलनाची घटी समीप आलीय... काही क्षणांची पाऊले चाललो की... फक्त तू अन मी... मग वेदनेचा वेद होईल... हे सारे विश्वच गोकुळ होईल... परत एकदा बासुरी ओठांना बिलगेल... त्यातून फक्त एकच सूर उमलेल...

राधे!!! राधे!!!
.
.
.
राधे... थांब ग आता काही क्षणांचाच अवधी आहे ग...!!!

- प्रशांत शेलटकर

श्रीगणेशा

नमस्कार, मी प्रशांत शेलटकर.  माझ्या मनातले गद्य पद्य नियमीत मातृभाषेतून लिहीण्याकरिता ब्लॉग-लेखनाचा श्रीगणेशा करीत आहे. अक्षरपूजा या ब्लॉगवरील  माझ्या लेखनाला वाचकांकडून प्रतिसाद, प्रतिक्रिया तसेच पाठिंबा मिळेल अशी आशा आहे.

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...