Ad

Wednesday, 31 December 2025

तोच दिवस तीच रात्र

तोच दिवस तीच रात्र...

तोच सूर्य तोच दिवस 
काही नाही बदलणार 
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार..

तीच नोकरी तोच धंदा
तोच बॉस तिथेच असणार
सेलिब्रेशनला फक्त निमित्त
दुसरं काय कारण असणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

तीच बायको तोच नवरा 
त्याच त्याच तक्रारी असणार 
तोच पोलीस तिच शिट्टी
दुसरं काय अजून वाजवणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

तेच आमदार तेच खासदार
त्याच योजना तेच सरकार
मागच्या वर्षीचे तेच दळण
दुसरं काय अजून दळणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

त्याच फॉरवर्डेड शुभेच्छा
त्याच त्याच पुढे पाठवणार..
अणि मेमरी फुल्ल म्हणून
आणखी काय नवीन होणार
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

म्हणून सांगतो आता मित्रांनो
आता अगदी शांत झोपणार
काल रात्री सुद्धा वाजले बारा 
आज काय तेरा वाजणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

तोच सूर्य तोच दिवस 
काही नाही बदलणार 
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार..

@ प्रशांत😄😄😄

Saturday, 27 December 2025

प्रश्न???

प्रश्न...????

निमाव्या देहजाणिवा
पार्थिवाचा मोह दिगंती..
पण थरथरतो विवेकही
कशी लागावी संगती...

रुजून आल्या भावना
मातीतूनच जनुकाच्या
जळता जळेना जुनाट
या गाठी संचिताच्या..

साधनेचे शुन्य संचित
तरी नाव लोटली पुरात 
ना  देती दिशा इशारा
तरी भरला वारा शिडात

प्रश्नपक्षी आभाळभर
एकासही ना घरटे परंतु
किती उत्तरे मिळाली तरी
मनात उरतोच किंतु..

उत्तराचे मोह कशाला?
प्रश्नच उरावे भोवती
माझ्या जितेपणाची 
हीच खूण शेवटी...

@प्रशांत

Thursday, 25 December 2025

दादा...

दादा....

कुठे चालली दिंडी 
ठाव तिचा नाही..
विटेवर आज माझा
विठ्ठल मात्र नाही....

संथ चालती पाऊले
टाळ झाले मुके..
ओलावा निघून गेला
डोळे झाले सुके..

तुटली नाती आता
कोरडीच रे माया..
विठ्ठला तुझ्याविना 
जीव उठतो खाया

माय गेली बाप गेला
गेला आधारवड
उडून गेले सर्व पक्षी
उभे कसे तरी खोड

पांगले वारकरी आता
तुटली त्यांची हो नाळ 
चालतो एकटाच मी
संथ वाजवित टाळ 

मनातला विठ्ठल माझ्या
मनात हो जागा
हृदयाच्या विटेवर
बाप माझा उभा..

@ प्रशांत..

( कै दादांच्या स्मृतीस समर्पित..)

Monday, 8 December 2025

तंत्रजीवी..

तंत्रजीवी..

व्यस्त कोणी नसतो हो
उगाच आपल काहीतरी
अग्रक्रम आपले ठरलेले
सबब आपली काहीतरी 

मीटिंग आहे,काम आहे
असतात फक्त बहाणे
टाळायचे कसे तुम्हाला
विचार करतात शहाणे

सोशल वर्क? शी बाई
भिकेचेच बाई डोहाळे
त्यापेक्षा किटी पार्टीचे 
रम्य किती ग सोहळे

मी आणि माझच विश्व
बाकीच्यांना नो एन्ट्री
माझं वर्तुळ माझा परीघ
मीच त्याचा सेंट्री..

माणसं यंत्राळली आता
आणि यंत्र माणसाळली 
माणूस झाला तंत्रजीवी
माणुसकी मात्र ओशाळली 

@ प्रशांत

Tuesday, 2 December 2025

देह शुद्ध करुनी भजनी भजावे।

देह शुद्ध करुनी भजनी भजावे। आणिकाचे नाठवावे दोष गुण।। धृ ।।
साधने समाधि नको पां उपाधी। सर्व समबुध्दी करी मन।। 1 ।।
म्हणे जनार्दन घेई अनुताप। सांडी पा संकल्प एकनाथा।। 2 ।।

... उपासना म्हणजे काय? हे जनार्दन महाराजांनी या अभंगात उत्तम रीतीने सांगितलं आहे..
    देह शुद्ध करूनी भजनी रमावे.. देह शुद्ध करणे म्हणजे फक्त स्नान करणे नव्हे.. तो निरोगी ठेवणे , स्वच्छ ठेवणे.. जी काही साधना देहाच्या माध्यमातून करायची असल्याने तो स्वच्छ ,निरोगी असणे आवश्यक असत..
   पुढे ते म्हणतात..आणिकाचे नाठवावे दोष गुण।। 
  सामान्यपणे माणस एकत्र आली की तिथे उपस्थित नसलेल्या माणसांबद्दल चर्चा चालू होते.. हे टाळल पाहिजे.. साधना करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे गेट टू गेदर नव्हे.. आणिकांचे नाठवावे दोषगुण यात केवळ दोष नाहीये गुण पण आठवू नका.. म्हणजे निंदाही नको आणि स्तुती देखील नको केवळ साधना करण्यावर लक्ष केंद्रित करावे..

पुढे ते म्हणतात..साधने समाधि नको पां उपाधी। सर्व समबुध्दी करी मन।। 1 ।।
     साधना करताना कसली उपाधी नको ,उपाधी अहंकार घेऊन येते.. भक्तीचा पण अहंकार असू शकतो,इतकी पारायणे केली,इतके जप केले,इतक्या तीर्थ यात्रा केल्या.. इतके ग्रंथ वाचले.. हा अहंकार आहे तो सोडून सर्व सम बुद्धी झालं पाहिजे..सर्व सम बुद्धी म्हणजे सर्वांच्या ठिकाणी ईश्वर आहे ही भावना मनात ठेवणे.. मग तो माणूस कोणत्याही धर्म जाती पंथाचा असो.. माणूसच नाही सर्व प्राणिमात्रात ईश्वर आहे ही भावना मनात असावी..

शेवटच्या पंक्तीत महाराज म्हणतात..
म्हणे जनार्दन घेई अनुताप। सांडी पा संकल्प एकनाथा।। 2 ।।
  अनुताप म्हणजे भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल संबंधित लोकांची क्षमा मागून , पुन्हा त्या चुका करू नये याचा निश्चय करणे. 
पुढची ओळ महत्वाची सांडी पा संकल्प एकनाथा.सांडी म्हणजे सोडून दे..भक्ती करण्याचा संकल्प सुद्धा सोडून दे इतक्या उच्च पातळी वर ये एकनाथा..भक्तीचा संकल्प ही पहिली स्थिती झाली,ती चुकीची नाही..पण तिथेच अडकू नये..कारण तिथेही मी संकल्प केलाय हा सूक्ष्म अहंकार आहेच..म्हणून तो सूक्ष्म अहंकार सुद्धा नको..आणि ते सोडल्याशिवाय ईश्वर आणि भक्त यांचे अद्वैत होणार नाही..
    नितांत सुंदर अभंग आणि तितकाच सुमन ताईंचा नितळ स्वर..
देह शुद्ध करुनी भजनी भजावे। आणिकाचे नाठवावे दोष गुण।। धृ

.... प्रशांत ☺️

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...