Ad

Monday, 30 June 2025

एकटी

अकाली जोडीदार गेलेल्या स्त्रीचे भावविश्व..

एकटी..

गेलास सोडून एकटीला
एकांत हा छळतो आहे
आशेचा एकेक  चिरा 
आता निःशब्द ढळतो आहे 

कशी पहावी स्वप्न 
राख रांगोळी झाल्यावर 
राखेतला फिनिक्स पक्षी 
पुन्हा राख झाल्यावर

लढ म्हणून सांगायला 
किती किती सोपं असतं 
ज्याच जातं सर्वस्व 
त्यालाच ते कळत असतं 

भाऊ बहीण सगे सोयरे 
कुंपणावरचे सरडे..
तीन दिवस रंग उधळतात
बांधावरचे तेरडे...

सगळंच गेलं वाहून 
आता हिशोब कसला नाही 
लढायचं तरी कशासाठी 
त्याचा मेळ लागतं नाही 

सण उत्सव समारंभ
बेदखल मी सगळीकडे
आता भोंवती वावरतात
वासनांध लोचट गिधाडे

गंथन जोडवी मंगळसूत्र
तटा तटा तुटली
तथाकथित संस्कृती ही
किती निर्लज्ज झाली

तू गेलास..सुटलास रे
मी इथे रोज मरते..
सावरली लोक म्हणतात
मी आतून झीजते

जेवढे शिल्लक श्वास 
तेवढेच आता आयुष्य 
आपल्याच माणसात मी 
अबोल आणि अस्पृश्य 

-प्रशांत

Friday, 27 June 2025

लाडकी बहीण आणि मॉब सायकॉलॉजी

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

लाडकी बहीण आणि मॉब सायकॉलॉजी -(समूह मानस शास्त्र)

सभेत एक टाळी वाजली की हजारो टाळ्या वाजायला लागतात,

दंगलीत एकाने दगड उचलला की हजारो हात दगड उचलतात 

स्टेडियम मध्ये जेव्हा प्रेक्षकांचा एक गट मेक्सिकन वेव्हज आणतो तेव्हा ती वेव्हज  संपूर्ण स्टेडियम व्यापते 

पानिपतात विश्वास रावाला गोळी लागते, सदाशिव भाऊ दिसेनासे होतात आणि मराठे जिंकत आलेले युद्ध हरतात..

ही सर्व मॉब सायकॉलॉजी किंवा समुहाच्या मानस शास्त्राची उदा हरणे आहेत,

व्यक्तीला विवेक, बुद्धी, तर्क असतात, समूहात हे सगळं क्षीण होतं. त्याची जागा भावना घेतात.. समूहाला एक मन असत त्याचा आय क्यू  कमी आणि इ क्यू म्हणजे भावनांक जास्त असतो. 
     जेव्हा बाजारात सेल लागतात तेव्हा गर्दी होते ती याच कारणाने. होते..गर्दीच एक सामूहिक मन तयार झाल्या मूळे व्यक्तीगत मनाचा लोप होतो किंवा ते समूह मनाशी लिंक होते. जे समूह करेल ते व्यक्ती करू लागते
      लाडकी बहीण ह्या योजनेचे मानस शास्त्रीय विश्लेषण करून बघा..
      सुरक्षित रहाणे आणि आनंद घेणे ह्या बेसिक भावना आहेत.या दोन्ही भावना लाडक्या बहीण योजनेत आहेत. शासन देतय ना मग ते घेतले पाहिजे या भावनेने कितीतरी सुखवस्तु बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.एकीला मिळाल की दुसरीला असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटायला लागतं.
    ती घेते मग मी का नाही? सगळे घेतात मग मी का नाही? या विचाराने अस्वस्थ होतं जातात.माझ्याजवळ पुरेसे असताना मी केवळ मोफत मिळते म्हणून घेणार का..यात विवेक कुठे आहे? तारतम्य कुठं आहे?

एकदा आपल मन समुहाच्या ताब्यात दिल की ते बेसिक भावनांचा विचार करते.विवेक तर्क बाजूला ठेवते याच हे एक उदाहरण आहे..

-© प्रशांत शेलटकर✒️

Thursday, 5 June 2025

तथ्य-(लेख)

तथ्य-1 


पूर्वी राजेशाही होती आताही राजेशाहीच आहे.. फरक इतकाच की पूर्वी ती वंशपरंपरेने मिळायची आता लोकशाही मार्गाने मिळते..मतपेटी जुने राजे निवडते किंवा नवीन राजे निवडून देते..पण निवडून देते ते राजेच...क्वचित एखादा साधा माणूस निवडून दिला तर तो पाच वर्षात राजा होतो..


तथ्य-2

सत्तेत येणे हेच राजकीय पक्षाचे ध्येय असते, जनसेवा हा सत्तेत येण्याचा एक मार्ग आहे . सत्ता मिळवणे हे एकच ध्येय असल्याने विरोधक संपवणे यात गैर नाही.जे संपण्याच्या लायकीचे असतात ते संपतातच हा डार्विन चा सिद्धांत राजकारणाला देखील लागू आहे. राजकारण हे नेहमीच निर्मम राहिले आहे.आणि कार्यकर्ते हळवे.

तथ्य-3

पंथ (धर्म नव्हे) ही एक फसलेली व्यवस्था आहे. प्रेषितांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनुयायी काही वर्षातच पंथ ताब्यात घेतात आणि मूळ उद्देश भरकटत जातो आणि त्याला कर्मकांडी रूप येते.प्राण्याचा माणूस बनवता बनवता माणसाचे प्राणी करण्याचे अद्भुत सामर्थ्य पंथामध्ये असते. जेवढे अत्याचार धर्म स्वीकारावा म्हणून झालेत तेवढेच अत्याचार धर्म नाकारावा म्हणून झालेत.कोणी कोणास नावे ठेऊ नयेत

तथ्य-4

अमुक एका विचारसरणीचा असणे म्हणजे एका साच्यात स्वतःला बंदिस्त करून घेणे होय.एक विचार स्वीकारणे म्हणजे अन्य विचार नाकारणे.अन्य विचार नाकारणे म्हणजे माणसाला नाकारणे. आयुष्यभर एकाच विचारांचे असणे म्हणजे भूषण नव्हे..याचा अर्थ असा की आयुष्यभर तुमच्या मेंदूने एकाच पद्धतीने विचार केला आहे.विज्ञान जर बदलत जाते तर माणसाने पण बदलत जाणे नैसर्गिक आहे.


-प्रशांत शेलटकर

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...