Ad

Saturday 5 October 2019

मॅनर्स

*मॅनर्स*

सगळेच म्हणतात नेहमी आनंदी रहावं... खरंच शक्य असतं का? अवचित आलेलं सुखं चेहऱ्याला एक छान स्मित देत असलं तरी मनात सलणारी वेदना नेहमीच डोळ्यातून वहाते हे वास्तव नाही का?
    सतत आनंदी दिसणारा माणूस खरंच तसा असतो का? हा एक लाखमोलाचा प्रश्न..माणसं हसतात अगदी दिलखुलास पण रडताना का संकोचतात...मनमोकळे रडणे ही काय बुझदीली आहे का?
    येणारा प्रत्येक क्षण आनंदच घेऊन यावा असा हट्ट का करावा माणसानं... साखरेचा कण गोडवा घेऊन येणार ,अन मिठाचा कण खारट पणा ..तो त्या कणाचा स्थायीभाव नाही का?
    मग आपल्या आयुष्यात येणारे सर्वच क्षण आनंदाचे कसे असतील..अपमानाचे, नैराश्येचे,विफलतेचे क्षण पण येणारच ना मग त्या क्षणांना आनंदाने सामोरे जावं असं म्हणतात म्हणजे नेमकं काय करावं? रडू आलं तरी रडू नये? चिडावं अस वाटलं तर चिडू नये? की उगाचच आनंदी असल्याचा देखावा करावा?
     असे देखावे करण्यापेक्षा त्या क्षणांना न्याय दयावा...रडावस वाटलं तर बिनधास्त रडावं..चिडावं अस वाटलं तर चिडावं...पण व्यक्त व्हावं..कधी कधी माणूस स्वतःच्याच प्रतिमेत अडकून बसतो..व्यक्त व्हायची पण भीती वाटत रहाते.. ही एक प्रकारची आत्मवंचनाच नाही का?
    आत्यंतिक दुःखाच्या वेळी सावर रे रडू नकोस सांगणारे खूप असतात.त्या दुःखाचा सल काय असतो ते सहन करणारा जाणत असतो..तो रडता रडताच सावरत जात असतो..हल्ली रडणे मॅनर्सलेस समजलं जातं. खरं म्हणजे
    माणसं हल्ली उस्फुर्त व्यक्त होतच नाहीत.ती फक्त एटिकेट्स,मॅनर्स च्या फुटपट्ट्या स्वतःला लावतात आणि घुसमटत राहतात. हे कॉर्पोरेट मॅनर्स आपल्या जगण्याचाच  गळा घोटणार की काय अशी भीती वाटत राहते आजकाल..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको..  सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हात...