Ad

Thursday, 7 November 2024

ती..

ती....

सर्वस्व गेल्यावर
देव नाही हे कळतं
कसं कोणाला कळेल
आत किती जळतं...?

लोक ना आजकाल
किती हुकमी रडतात..
रडता रडता उगाच
गळ्यातही पडतात

चार दिवसाचे रंग
चार दिवसातच उडतात
एकांतात फक्त
दोन डोळेच रडतात..

न सांगताच गेला तो
अस कस विसरला?
सप्तपदीच्या पाऊल खुणा
असा कसा पुसून गेला..?

दिवस जातो उदास
रात्र भिजून जाते..
अन प्रत्येक क्षणाला 
त्याची आठवण येते..

लग्न म्हणू की 
झाली फक्त भातुकली
इवलुशा संसारात
कुठून शिरला ग कली

देवापुढे आता
डोइ  झुकतच नाही
देवच आता नजरेला 
नजर काही देत नाही

बरे झालेच की आता
पाश आता तुटले..
सात जन्माचे भोग
एका जन्मात भोगले

देवा पेक्षा नियती
नेहमी सरस ठरते
वेळ आली बिकट
तेथे देवाचे ना चालते

आता अंधार भेदून
लावीन म्हणते पणती
कोण काय म्हणतो
त्याची कशास गणती

भोगले जे दुःख त्याचे
मानीन मी उपकार
घावाशिवाय मूर्ती
काय घेईल आकार?

© प्रशांत

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...