Ad

Tuesday 29 June 2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?भाग-3

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

भाग-3

माणूस हा विश्वापासून वेगळा आहे? की तो विश्वाचाच भाग आहे? तो विश्वाचाचा भाग असेल तर तो विश्वाचेच आकलन कसे करू शकतो? स्वतःचे डोळे स्वतःलाच कसे पहातील?
   हे विश्वनिर्माण झाले त्यातून माणूस निर्माण झाला. बरं झाला तो झाला त्या प्रक्रियेत त्याचा मेंदू इतका विकसित झाला की की तो आपल्याच निर्माण प्रक्रियेचे आकलन करू लागला, का आणि कसे हे प्रश्न विचारू लागला? मुळात ही प्रेरणा आली कुठून?
    आणि हाच प्रश्न बिगबँग ला विचारू शकतो की, बाबा तू झालास म्हणून हे विश्व निर्माण झाले कबूल पण तू झालासच का?  आणि कशासाठी? तुला कोणीतरी जाणून घ्यावे म्हणून तू अब्जावधी वर्षांनी माणूस जन्माला घातला का? 
      हे प्रश्न जसे विज्ञानाला पडले तसे अध्यात्मालाही पडले, द्वैत विचारते,कोsहम ..मी कोण आहे? अद्वैत उत्तर देते सोs हम
"तो मीच आहे" किंवा तो तूच आहेस? देह म्हणजे एक आकार आहे तो टेम्पररी आहे.पण त्यात जे चेतन आहे ते वैश्विक चेतनेशी जोडले गेले आहे. त्या वैश्विक चेतनेला स्वतःलाच स्वतः जाणून घेण्याची इच्छा झाली म्हणून तिने देह निर्माण केले का? फारच गुंतागुंतीचा प्रश्न.. स्वतःच स्वतःकडे पहायच कारण स्वतःलाच स्वतःला जाणून घेण्याची प्रेरणा स्वतःच निर्माण होते. फार तर स्वयंप्रेरणा म्हणूया पण यात "स्वयं" कोण? माणूस की माणसाचा मेंदू? की  देहात असलेले चेतन?? डोक्यात एकदम केमिकल लोचा होतो..
      बरं हे प्रश्न फक्त अध्यात्मालाच पडतात का? विज्ञानाचा प्रवास पण असाच इंटरेस्टिंग आहे. विज्ञानाच्या प्रथम टप्प्यात अस मान्य होत की सर्व जडच (मॅटर) आहे, पण नंतर लक्षात आलं की सगळंच काही जड नाही ,त्यात चेतन (एनर्जी) पण आहे. पुढच्या टप्प्यावर लक्षात आलं की सर्वच विश्व कण आणि लहरींनी बनले आहे. पार्टीकल अँड वेव्हज थियरी..अगदी जो जड ( मॅटर) समजला गेलेला दगड ही कणांनी बनलेला आहे..जसे सूक्ष्मात जाऊ तसे लक्षांत येत की दगडाच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन गतिमान असतो.
     अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही अस समजलं तर कधी कधी वाटत की विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आकलनाचे निकष आणि मार्ग वेगळे आहेत इतकच.

     बरं त्यातही एक गंमत आहे,विश्वाचे आकलन फक्त माणूसच करू शकतो? प्राणी करत नसतील? त्यांच्या पद्धती वेगळ्या असू शकतील. बर विश्वाच्या महाप्रचंड विस्तारात आपण एकटेच असू? आपल्या एलियन बंधूचे वेगळे विज्ञान आणि अध्यात्म असू शकते. जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज माणूस नावाच्या प्राण्याला असते, पृथ्वी शिवाय अन्य ग्रहावर ऑक्सिजन नाही म्हणून तिथे जीवसृष्टी नाही अस आपण ठामपणे म्हणू शकत नाही.मिथेन वर जगणारी प्राणिसृष्टी असू शकते ना भाऊ...?
     
भाग-3

प्रशांत शेलटकर
8600583846
30/06/2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?भाग-2

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

भाग-2

डोक्यातला प्रगत मेंदू आणि हाताचा अंगठा यामुळे गुहेतील माणूस कच्च्या घरात आला,शिकार सोडून शेती करायला लागला, व्यापार करू लागला , शहर निर्माण झाली, टोळ्यांचे "समाज" झाले. निसर्गाला देव मानता मानता त्याची प्रतीके बनली, प्रतिकांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली, श्रेष्ठत्व ,कनिष्ठत्व निर्माण झाले, देव बाजूला झाले, प्रेषित निर्माण झाले, प्रत्येक प्रेषितांचे वेगळे तत्वज्ञान झाले. त्यांचे अनुयायी निर्माण झाले.त्यांच्यात संघर्ष झाले, रक्तपात झाले,
    मानवी इतिहासाला वेगळी वेगळी वळणे लागत गेली. धर्म आणि विज्ञान यात संघर्ष निर्माण झाले. विज्ञान आपल्या पद्धतीने विश्वाच्या रचनेकडे पाहायला लागले, धर्म आपल्या पद्धतीने विश्वाचे कोडे सोडवायला लागले. 
      जे दिसते, भासते,जे विज्ञानाच्या निकषावर टिकते तेच सत्य असे विज्ञान म्हणते.
      तू विश्वास ठेव म्हणजे तुला सत्याचे ज्ञान होईल असे अध्यात्म म्हणते.
      आजूबाजूचे जग हे सत्य आहे असे विज्ञान म्हणते. तर जग ही माया आहे असे अध्यात्म म्हणते.
    वैज्ञानिक निकषावर अध्यात्म टिकत नाही.पण वैज्ञानिक निकष ही काला प्रमाणे बदलत जातात.त्यामुळे विज्ञान आज जे निष्कर्ष काढेल ते अजून काही वर्षानंतर चुकिचे तरी ठरतात किंवा त्यात बदल होतो.आणि विज्ञान ते नम्रपणे मान्य करते.
     एकूणच हे सगळं मान्य केलं तरी आऊट ऑफ बॉक्स विचार केला तर काही वेगळेच प्रश्न निर्माण होतात.
     आपण सगळे मानव आहोत. आपल्या विकसनशील मेंदूच्या आकलनां नुसार ,शारीरिक आणि मानसिक मर्यादा आणि बलस्थानानुसार  जगाकडे पाहत असतो. एका माणसाला जे दिसेल तेच शंभर माणसांना,तेच हजार माणसांना,तेच लाखो कोट्यावधी माणसांना दिसत म्हणून ते सत्य आहे असे म्हणतो. जर एका माणसाने आंब्याचे झाड पाहिले तर हजार, शंभर, लाखो माणसाना पण तेच आंब्याचे झाड दिसेल.कारण सगळ्यांकडे "माणसाचा" मेंदू आहे. म्हणून सर्व माणसांसाठी तेच सत्य आहे. पण समजा अगदी रात्रीचा मिट्ट काळोख आहे.डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही.त्यावेळी कुठल्याच माणसाला ते दिसणार नाही.कारण अंधारात पहायची मानवी मेंदूची क्षमताच नाही. पण वटवाघूळ किंवा मांजराला ते दिसूं शकते. कारण अंधारात पाहण्याची विशेष क्षमता त्यांच्याकडे असते
     जे दिसते ते सत्य आहे असे मेंदूचे आकलन सांगते.वास्तवात ते वेगळे असू शकते तसेच जे दिसत नाही ते मानवी मेंदूला आकलन झालेले नसते पण ते वास्तवात तिथे असण्याची शक्यता असू शकते.
     एकूणच मानवी बुद्धी जेवढ आकलन करेल तेव्हढंच सत्य असते असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते मानवी आकलनाच्या मर्यादेत राहून केलेले विधान असते.
     विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत माणूस निर्माण झाला आणि त्यानेच विश्वनिर्मितीची प्रक्रिया शोधून काढली किती विलक्षण आहे हे!

भाग-2

प्रशांत शेलटकर
8600583846
29/06/2021

Monday 28 June 2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

हे विश्व निर्माण होण्याचे कारण म्हणजे बिगबँग हे आज पर्यंत सर्वात मान्य असलेले कारण.. बिगबँग झाला आणि विश्व निर्माण झाले अस सांगितलं जातं पण तो का झाला? हे अजून कळलं नाही..भविष्यात कदाचित कळेलही..एका तासाच्या (की मिनिटाच्या?) परिमाणात विश्वनिर्मितीचा इतिहास सांगितला जातो.पण त्यातही चार सेकंदापर्यंत जाता येते..पण पाहिले चार सेकंद काय झाले हे सांगता येत नाही.. काळाच्या पुढे अजून एखादी मिती  भविष्यात सिद्ध झाली तर कदाचित बिगबँग पासून पहिल्या चार सेकंदात काय घडले ते विज्ञान शोधून काढेल कदाचित...
      पण आपण एकवेळ गृहीत धरू की बिगबँग मुळे विश्व निर्माण झालं. तरी त्या क्षणापासून ते आजच्या क्षणापर्यंतचा प्रवास अनेक गूढ प्रश्न निर्माण करतो. अर्थात मला तस वाटतं. मी कोणतंही स्टेटमेंट अगदी फर्म करीत नाहीये..लहान मुलाच्या औत्सुक्याने मला ते प्रश्न पडले आहेत..
     बिगबँग झाला. त्यातून अनंत सूर्य निर्माण झाले,त्याच्या अनंत सूर्यमाला निर्माण झाल्या..आपलीही त्यातून निर्माण झाली. आपल्या सूर्याचे ग्रह एकमेकांशी टक्कर न घेता  सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरू लागले. त्यातील काही स्वतःचे उपग्रह स्वतःभोवती फिरवत राहिले. गुरुत्वाकर्षण नावाची अचाट शक्तीने या ग्रह उपग्रहांच्या कक्षा अशा काही ठरवून दिल्यात की ते आपली मर्यादा इंचभरही सोडत नाहीत.
हे एक गूढ....
      सूर्यापासून विशिष्ट अंतरावर एक ग्रह फिरत रहावा. आणि त्या विशिष्ट अंतरामुळेच त्याच्यावर जीवसृष्टी निर्माण व्हावी 
हे आणखी एक गूढ...
     आपली पृथ्वी सूर्यापासून विशिष्ट अंतरावर परिभ्रमण करत  स्वतःभोवती फिरत राहिली..फिरता फिरता थंड झाली..बरं फिरताना ती परफेक्ट गोल फिरत नाही ती उत्तर-दक्षिण थोडी कलली...तिचा आस थोडा कलला म्हणून पृथ्वीवर ऋतुचक्र निर्माण झाले, उन्हाळा आणि हिवाळा यामुळे पृथ्वीचे वातावरण "बॅलन्स" झाले ..पावसाळा हे उन्हाळ्याचे "बायप्रॉडक्ट" आहे.
 ऋतुचक निर्माण झाले म्हणून जीव निर्माण होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले हे पण एक गूढच...
     पहिला जीव निर्माण झाला,वनस्पती निर्माण झाल्या, पाण्यातील काही जीव पाण्यातच राहिले,त्यातले काही जमिनीवर आले, त्यातले काही जमिनीवर राहिले आणि काही आकाशात उडू लागले. 
      मूळ जीवामध्ये कदाचित टिकून राहण्याच्या प्रेरणेने जनुकीय बदल होत गेले, त्यामुळे काही जीव जमिनीवर राहू लागले त्याना जमिनिवर चालण्यासाठी पाय फुटले, असंख्य पायांच्या गोमी पासून चार पायांच्या वाघ,सिंह,वानर या सारख्या प्राण्यांपर्यंत असंख्य प्राणी निर्माण झाले. त्यातल्या काही प्राण्यांना जमिनीवर असुरक्षित वाटायला लागले,त्यांना पंख फुटले ते आकाशात उडायला लागले.त्याना पक्षी म्हणून ओळखल जाऊ लागलं.पुढे आदिमानव निर्माण झाला. पुढच्या दोन पायांचे रूपांतर हातात झाले..असे म्हणतात की माणसाच्या हाताच्या पंजात अंगठयाचे जे वेगळे स्थान आहे त्यामुळे माणसाने पुढची प्रगती फार झपाटयाने केली.माणसाचा अंगठा इतर प्राण्यांच्या तुलनेत गोल फिरू शकतो त्यामुळे कोणत्याही वस्तूवरची पकड अधिक मजबूत झाली.मला तर अस वाटत की या अंगठयाने माणसाला प्रचंड आत्मविश्वास दिला. स्वतःचे संरक्षण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी तो अंगठयांच्या अद्वितीय स्थानामुळे तो करू शकला.

भाग -1

-प्रशांत शेलटकर
8600583846
 29/06/2021

Friday 25 June 2021

दिदीचा सल्ला

दिदीचा सल्ला...😀

फार खोल माझ्यात
जायचेच नाही
इन- बॉक्सात माझ्या 
यायचेच नाही

नियमित जेवते मी
काळजी कशाला?
जेवलीस का ?
कधी विचारायचे नाही

तुझी मॉर्निंग गुड
असू दे रे वेड्या
मला रोज गुड मॉर्निंग
करायचेच नाही

तशी मी निवांत
झोपते रे रात्री
तुझ्या गुड नाईटची
वेड्या गरजच नाही

तुझे हे बहाणे
ठावूकै ना मला
उगा जवळ येण्याची
वेड्या गरजच नाही

पडते आजारी मी
मी माणूस आहे
तुला काळजीची
वेड्या गरजच नाही

किती मी सुंदर ते
रोज आरसा सांगे मला
झाडावर हरभऱ्याच्या
चढवण्याचे काम नाही

गोड शब्दांच्या जिलेब्या
पाड तुझ्या तू कितीही
बुडवायला अरे मठ्ठा
इथे मिळणार नाही

जखमा खऱ्या खोट्या
उघड केल्यास तरी
लावायला मलम इथे
मिळणार नाही

जा सुखाने नांद
तुझ्या वॉल वर
इथे डोकवण्याचे
तुझे काम नाही..

✍️
-प्रशांत शेलटकर
 मु पो गोळप
 ता.जि. रत्नागिरी
 8600583846
26/जून/2021

Wednesday 23 June 2021

निज अंकुरे अंकुरे..

बीज अंकुटे अंकुरे...यावरून सुचलेले विडंबन


निज अंकुरे अंकुरे 
पेंगुळल्या लोचनांत
कसे निजावे बापड्यानी
अशा भर उकाड्यात

जिवा हवी मस्त गादी
अन उशीही उशाला..
भर वेगात फिरणारा
पंखा हवा छपराला
पण ऐनवेळी भरे
लायटीला हा वात
कसे निजावे बापडयानी
अशा भर उकाड्यात

डोळा लागता हो जरा
करी डास हा गुणगुण
कान इथेच माणसाचा
त्याला कशी कुणकुण ?
फटकावता त्याला फुटे
 आपलेच कानफाट
कसे निजावे बापडयानी
अशा भर उकाड्यात

घेता डोईवर  चादर
जीव होई कासावीस
जरा मोकळे झोपता
चावा घेती फार डास
डास मारता मारता
होई रात्रीचाच अंत
कसे निजावे बापडयानी
अशा भर उकाड्यात
निज अंकुरे अंकुरे 
पेंगुळल्या लोचनांत
कसे निजावे बापड्यानी
अशा भर उकाड्यात

😊-प्रशांत शेलटकर
 8600583846
24/06/2021

Tuesday 8 June 2021

व्यंजन जोड्या

अस म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच जुळून आलेल्या असतात..आणि हे माणसाच्याच बाबतीत असतं अस ही नाही पदार्थांच्या बाबतीतही शक्य आहे.
बघा ना मिसळीची जोडी पावाशिवाय जमुच शकत नाही.तिखट मिसळीचा पावा सारखा सौम्य जोडीदार शोधूनही सापडणार नाही..पावाची जोडी उसळीशीही जमते पण ती खुलत नाही...ती घरच्यांनी जमवून दिलेल्या लग्नासारखी वाटते..अगदी तडजोड म्हणून मिसळ-पावाची  लग्नगाठ मात्र जणू स्वर्गातूनच जुळून आलेली..
        बासुंदी-पुरी या खरतर जिवलग मैत्रिणी..दोघींना एकमेकींशिवाय करमतच नाही.. पण जोडीदार म्हणून पुरीला कूर्माच शोभून दिसतो.. कुर्मा-पुरी ही जोडी तशीच स्वर्गातूनच गाठ बांधून आलेली..बिचारी बासुंदीला जोडीदारच नाही...ती अविवाहितच राहते तिला तडजोड करायलाच आवडत नाही..जिलेबीच एक बर असत ती स्वतः सुंदर असली तरी तिला गर्व नाही ..मठ्ठ असला तरी मठ्ठयाशी ती सूत जुळवते आणि मठ्ठा-जिलेबीचा संसार सुखाचा होतो..
       व्यंजनाच्या दुनियेत वडा-पाव म्हणजे ही दोस्ती तुटायची न्हाय या कॅटेगरीतले..दोघांची जोडी लय फेमस..पण या वड्याला पण जोडीदारच नाही..कधीतरी लिव्ह अँड रिलेशनशीप मध्ये राहतो तो चटणीबरोबर..पण ते नातंच कोणाला फार पसंद नाही..मग कधीतरी सांबाऱ्यात उडी मारून जीव देतो बिचारा..
      पाव बिचारा अगदी साधा त्याचे नखरे नसतात..त्याच्याकडे चवींची मिजास नसते..तो फक्त वयोमानानुसार शिळा होतो..त्याच्या या सालस स्वभावामुळे त्याला मित्र -मैत्रिणी खूप, वडा-पाव,मिसळ-पाव, उसळ-पाव, भुर्जी-पाव, अंडा-पाव, पाव-भाजी कोणाशीही पटत त्याचे...
      व्यंजनाच्या गोतावळ्यात एक समाजसेवी जोडपे राहूनच गेले...झुणका-भाकर...झणझणीत झुणक्याला गरिबाघरची लेक भाकरीच सांभाळून घेऊ शकते..झुणका स्वभावाने तिखट असला तरी भाकरी त्याला सांभाळून घेते...हे जोडपं गरीब आहे..आणि त्याना एक मूल देखील आहे बरं का कांदा नावाचं....
     सगळयांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या..त्या तशाच शोभून दिसतात नाही का....

प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday 5 June 2021

पाऊस कोणासारखा?

पाऊस कोणासारखा?


पाऊस कोणासारखा?
ज्याच्या त्याच्या मनासारखा...

पाऊस....
कुणासाठी फक्त चिखल उगाच
कुणाला दिसेल त्यात मोराचा नाच

पाऊस...
कुणासाठी फक्त पडते पाणी
कुणासाठी मस्त पाऊस गाणी

पाऊस...
कुणासाठी नुसता वैताग अडचण
कुणासाठी मात्र हळवे कातर क्षण

पाऊस...

कोणी म्हणती ही नसती व्याधी
कुणाला लागेल त्यातही समाधी

पाऊस....
कुणासाठी वादळ,वारा, मच्छर
कुणासाठी दरवळे मातीतून अत्तर

पाऊस...
कुणी म्हणते फार गडगडते आज
कुणी म्हणे मेघमल्हार ऐकू आज

पाऊस..
कुणासाठी मिट्ट  उदास अंधार
कुणी म्हणे आज थेंब थेंब गंधार


पाऊस कोणासारखा?
ज्याच्या त्याच्या मनासारखा...


✍️
-प्रशांत शशिकांत शेलटकर
 मु.पो.गोळप, रत्नागिरी
 06/06/2021
 8600 58 38 46

Wednesday 2 June 2021

निरोप

निरोप...


कौतुकाचे चार शब्द, प्रेरणा देतात..निंदेचे चार शब्द आपले पाय जमिनीवर ठेवतात..आणि जर संवादच नसेल तर तो नसलेला संवादचं काहीतरी सांगत असतो..हा बिनशब्दांचा संवाद सांगत असतो चल तुझी निघायची वेळ झाली...आता बस्स कर
नाते निभावण्याचे ओझे दोन्ही खांद्यावर असेल तर ते सुसह्य असते पण ते एकाच खांद्यावर आले की असह्य होते.. चिडचिड होते.मग अशा नात्यांना फुलस्टॉप देणे गरजेचे असते..

एक सुंदर गाणं आहे...
चलो इक बार फिरसे 
अजनबी बन जाये हम दोनो...
असे अजनबी होणे प्रत्येक वेळी दुःखदच असावं असं काही नसते..एका खूबसुरत वळणावर एकमेकांना हसून बाय बाय करणे जास्त सुखद नाही का..?
     कुणाच्या पायाखाली काटे पसरून निरोप घेण्यापेक्षा, त्याची ओंजळ जगून गेलेल्या आनंदक्षणांनी भरून का टाकू नये..दुसऱ्याची ओंजळ फुलांनी भरता भरता आपली ओंजळ रिती झाली तरी ती सुगंधी तरी होतेच होते..या रित्या ओंजळीचे कौतुक जास्तच व्हायला हवे..तिला इदं न मम् म्हणण्याचे भाग्य लाभलेले असते..
     सगळेच निरोप दुःखद नसतात.. काही निरोप अडलेले प्रवाह मोकळे करणारे असतात..महान खेळाडू तो नव्हे जो अनेक विक्रम करतो..महान तोच जो कौतुक झेलत वेळेवर निवृत्त होतो...

अलविदा...💐

Have a nice day....💐

-प्रशांत शेलटकर
8600583846
03/06/2021

खंजीर

छातीवर वार करा रे
पाठीत खंजीर नको
समोर गोड बोलू नको रे
मागून निंदा नको..

दिले तुला इतके की
मी हिशेब ठेवला नाही
कौतुक तुझे करताना
मी कधीच थकलो नाही

इतुका बोललो तुझ्याशी
मी बोलून थकलो नाही
तोललेले शब्द तुझे
मला कळलेच नाही..

मी उगाचच समजून गेलो
माझ्या जवळचे  तुला
जवळचेच करतात घात
हे कधी ना कळले मला

जोवर होतो हुकमी एक्का
तोवर होतो देव तुझा
गरज संपली आता धक्का
म्हणे कोण रे तू माझा

जा आता निघून जा
मी आता आहे खम्बीर
परत कुणाच्या पाठीमध्ये
खुपसू नकोस पुन्हा खंजीर

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 मु पो गोळप ता.रत्नागिरी
8600583846
02/06/2021






स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...