Ad

Sunday 27 August 2023

शहाणपण..

शहाणपण...

सतत सांगायचं असतं
सतत बोलायच असतं
येन केन प्रकारेण,
सतत चर्चेत रहायच असतं

विषय समजो ना समजो
आपल मत असलंच पाहिजे
मता-मतांच्या गोधडीला
आपलं ठिगळ असलंच पाहिजे

सगळ्यातल सगळंच कळत
माहितीच माहिती चोहीकडे
गल्ली पासून दिल्लीपर्यंत
सगळ्यांनाच शिकवींन धडे

आपले आपले कळप
आपले आपले झेंडे
जयघोष करीत चालले
बिन डोक्याचे तांडे..

कळपात तर मज्जाच मज्जा
सगळंच सोपं होतं..
गर्दी नेईल तिकडे
आपोआप जाणे होते

गर्दीची पण असतेच हो
एक बेधुंद बेफाम नशा
नेता सांगेल तीच असते
गर्दीची पूर्व दिशा..

अहोरात्र असेच आपण
व्यक्त होत राहू
उसने पासने का होईना
दळण दळत राहू ....

जणू आपण नसलो तर
जगबुडीच होणार आहे
आपल्या वाचून जगाच
हर घडी अडणार आहे..

खुळेच हो तुम्ही आम्ही
कोण कोणाला विचारतो
लंगडे असले तरी जो तो
आपलेच घोडे दामटवतो

प्रत्येकवेळी बोललंच पाहिजे
मित्रा अस काही नसतं.
कधी कधी  न बोलण्यातच
शहाणपण लपलेले असतं

© प्रशांत शेलटकर

Tuesday 22 August 2023

पोकळ

हे वस्त्र भगवे केवळ
मन अजून टंच हिरवे
खोल खोल मनात अजून
घुमतात मस्त पारवे

हे केवळ खेळ भ्रमाचे
शब्दांचे केवळ  फुगे
कळले तर काहीच नाही
जरी संपली युगे

हे गणित कसले अवघड
का कधी कळते
कितीही भाग घालवा
बाकी वासना एकच उरते

ठोकून मस्त मांडी
मी निश्चयाने अगदी बसतो
नासिकाग्रे बळे बळे
मी दृष्टी लावून बसतो

पण निश्चयाची वाळू
पुनः पुन्हा निसटत रहाते
मध्यमेवरून मग निरर्थक
जपमाळ फिरत रहाते

मिटल्या डोळ्यासमोर
सुख उभे पार्थिवाचे
होते मग खमंग भजे
माझ्या ग अध्यात्माचे

जणू मी विश्वामित्र
डोळे मिटून बसलो
पण मनात नग्न मेनका
सतत चिंतीत बसलो

कसले मग देव धर्म
कसल्या ग या उपासना
कटी प्रदेशी साचल्या
युगा युगांच्या वासना

😃😃😃 

© कलाकांतसुत गोळपवाला..

Saturday 5 August 2023

नाती

नाती...

उंट शेवटच्या काडीने बसत नाही..शेवटची काडी ठेवण्या अगोदर अनेक असह्य ओझी त्याच्या पाठीवर ठेवलेली असतात ..नात्यांचे पण तसेच असते..नाती अचानक तुटत नाहीत , ती तुटायची सुरुवात कित्येक दिवस अगोदर झालेली असते..
     तसं पाहिलं तर प्रत्येक नात्याची एक टाइम लिमिट असते.त्याची सुद्धा एक एक्सपायरी डेट ठरलेली असते..आपल्याला ती वाचता येत नाही इतकंच..नाते नवीन असते तेव्हा ते एखाद्या हिरव्यागार रोपट्याप्रमाणे ताजे टवटवीत, हवेहवेसे असते कारण त्या रोपाला संवाद ,ओढ आणि वेळ याचे खतपाणी मिळत असते..ते एकदा कमी झाले की नात्यांचे रोप सुकत जाते..
   मग नाती केवळ निभावली जातात..नात्यात केवळ एक औपचारिकता शिल्लक राहते..सुकलेली फांदी जशी कडकन मोडते तशी ती नाती केव्हाही मोडून पडतात..एखादी घटना त्याला फक्त निमित्त ठरते..आपण फक्त त्या घटनेचा विचार करत बसतो..स्वतःला दोष देत कुढत बसतो ..खरा हिमनग पाण्याखाली असतो तो आपल्याला दिसतच नाही..नात्यातला ब्रेकप दुखावणारा असला तरी हे जग ..नातेसंबंध किती अशाश्वत आहे याचे ते एक प्रत्यंतर असते..एका अर्थाने पाश तुटत जातात ही गोष्ट चांगलीच नाही का ? या सगळ्या अशाश्वताचे ओझे घेऊन मोक्षाची वाट चालणे अवघडच होईल नाही तरी....होय ना?

-प्रशांत 😊

Thursday 3 August 2023

सिम्पल लॉजिक

सिम्पल लॉजिक..

अंदमानात दोन प्रकारचे कैदी पाठवले जात ...एक... अट्टल गुन्हेगार आणि दोन..मोस्ट डेंजरस राजकीय कैदी.. सावरकर अट्टल गुन्हेगार नव्हते ते राजकीय कैदी होते.मुळात अंदमानात राजकीय कैदी म्हणून पाठवले जाणे हाच देशभक्तीचा अस्सल पुरावा मानायला हरकत नाही. 
    बाकी लॉजिकल विचार केला तर निरंजन टकले यांनी जे मांडले आहे ते पटत जाते. ते बेडयांचा आवाज करून संवाद साधणे वगैरे..ही जर संवाद पद्धती असेल तर इतर राजकीय कैद्यांनी जे लिहिलं आहे त्यात त्याचा उल्लेख असनायला हवा होता.आता त्याचा प्रतिवाद काय होतो हे बघणे इंटरेस्टिंग ठरेल..
   महात्मा गांधींपासून सावरकरांपर्यन्त यांनी कुठेतरी आपलं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेऊन देशा साठी त्याग केलाय. आज सत्तर वर्षानंतर त्यांचेविषयी अनेक प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे .त्या माहितीचा लॉजीकली विचार केला जातोय ..गोष्ट चांगली आहे ..भाबडेपणे विचार करण्यापेक्षा वस्तुनिष्ठ विचार करणे केव्हाही चांगले ..पण एकदम टोक गाठून त्याना अरे तुरे करणे कधीच पटणार नाही. सावरकर या या ठिकाणी चुकीचे वागले आणि या या ठिकाणी बरोबर वागले.किंवा महात्मा गांधीची ही धोरणे चुकीची होती पण ही धोरणे योग्य होती ...अशी मांडणी ही विवेकाची असते.
    आपल्या व्यक्तिगत जीवनात देखील आपण काही ठिकाणी चुकतो काही ठिकाणी बरोबर असतो. सार्वजनिक व्यक्तिमत्वांना देवत्व दिले जाते हा आपला खास भारतीय गुण आहे.आणि म्हणून त्याचा मानस शास्त्रीय इफेक्ट म्हणून कोणालातरी खलनायक केले जातेच..आपण चांगल्यातले वाईट हायलाईट करतो आणि   वाईटातले चांगले हायलाईट करतो.चांगले वाईट सम बुद्धीने पाहिले पाहिजे.

-प्रशांत शेलटकर

Wednesday 2 August 2023

कापूस कोंडा

कापूस कोंडा...😊

ज्याच जसं आकलन
तसं त्याच जग..
कधीतरी खोल उतरून
मना मध्ये बघ..

दिसेल कोणाला साप
दिसेल कोणाला दोरी
उजेड अंधार खेळ सारे
दिसेल त्याच्या परी...

श्वान ऐकतो अनाहत
घुबड बघते अंधारात
अजून काय काय आहे
निसर्गाच्या पुस्तकात

लुकलूकतो बघ काजवा
कोण त्याला देतो प्रकाश
सुरवंटाचे होते फुलपाखरू
मिळता  जरा अवकाश

दिवस उगवतो नेमाने
नेमाने येते रात्र
वर्षांनुवर्षे  चालते वेड्या
दिवस-रात्रीचे अखंड सत्र

तरी तुला वाटते वेड्या
तुलाच सगळे कळते
सांग बरं त्या सूर्याची
धुनी अखंड का जळते

बिग बँगच्या अगोदर
काय बर होते?
अस्तित्वात नाहीच त्याला
नाव काय बरे होते?

नाही नाही म्हणताना
कशास नाही म्हणायचे
अस्तित्व नाकारताना ते
नकळत मान्य करायचे?

कापूसकोंड्याची गोष्ट
परत परत घडत असते
कधी उत्तरात प्रश्न तर 
कधी प्रश्नात उत्तर असते

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Tuesday 1 August 2023

हत वीर्य

हतवीर्य...

हत्ती आहे एकच
आंधळे झाले हजार
वर्णन ऐकून बिचारा
हत्ती झाला पसार

उजव्यांना दिसतो पाय
डाव्यांना दिसतो कान
आपलेच खरे करताना
कोणालाच नसते भान

खांबासारखा आहे हत्ती
उजवे आपले ठाम
हत्ती आहे सुपासारखा
डावे भांडती जाम

सगळेच इकडे आंधळे
तरी दुसऱ्यांना म्हणती अंध
निरर्थकच तो वाद असतो
कोंबडी आधी की अंड ?

पिसाटलेले विचारवंत
द्वेषाचा करती जागर
भरेल का सांगा पाण्याने
केली उलटी जर का घागर?

वाईटाला म्हणा वाईट
चांगल्याला म्हणा चांगले
चांगले वाईट ठरवताना
कशाला जातीचे दाखले?

काय सत्य काय असत्य
ठरवतो हल्ली मिडिया
ट्विटर वर टिव टिव करते
ज्याची त्याची चिडीया

हतवीर्य इथे अनेक अर्जुन
शत्रू कोण ते कळेच ना
प्रत्येकाची गीता वेगळी
सत्य काय ते उमजेच ना...

-प्रशांत शेलटकर
 8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...