Ad

Tuesday 22 November 2022

बघ आता कशी दिसतेस

बघ आता कशी दिसतेस....

ऐकलस का?
किचन मधून जरा
बाहेर ये...
पीठाने भरलेले हात
विस्कटलेले केस
तसेच राहू देत
आणि आरशासमोर 
उभी रहा..

....बघ कशी दिसतेस...

आता,
पीठाने भरलेले हात
धुऊन घे
विस्कटलेले केस..
बांधून घे..
अस्ताव्यस्त ओटा
आवरून घे
आता परत..
आरशासमोर उभी रहा

....बघ आता कशी दिसतेस...

आता तशीच 
बाथरूम मध्ये जा
केस बांधून घे
आणि शॉवर खाली उभी रहा
गाण्याची एक लकेर
उमलून येईल आपोआपच
तिला तशीच उमलुदे
तिथेही आरसा असेलच
त्यात बघ स्वतःला ..

....बघ आता कशी दिसतेस

केस बांधून बाहेर ये
मान थोडी तिरपी कर
केस पुसत आरशात बघ
मघाचची लकेर
लकेर अजून गळ्यात असेलच
थोडी हस आणि 
परत आरशात बघ ....

....बघ आता कशी दिसतेस


आता मस्त पैकी सजून घे
फिकटशी लिपस्टिक
ओठांवर फिरुदे..
केस मोकळेच असू दे ग
छान दिसतात तुला
आता आरशात न्याहाळ स्वतःला

.....बघ आता कशी दिसतेस


आता ना  तुला तो आठवेल
चक्क दिसेलही आरशात
तुझ्या मागेच असेल तो
आणि तू विचारशीलही त्याला
" सांग ना रे मी कशी दिसते"?
तो गालात किंचित हसेल
बोलणार तर काहीच नाही
फक्त मागूनच तुला कवेत घेईल
तो काही बोलला नाही तरी
त्याचा स्पर्श सांगेल तुला
की तू खूप छान दिसतेस...

नकळत डोळे भरून येतील
क्षणभर डोळे मिटून घेशील
परत डोळे उघडशील तेव्हा
मागे तो नसेल...
नकळत डोळे टिपून घेशील
पुन्हा नजर आरशात जाईल

.. बघ आता कशी दिसतेस

कंठ दाटून येईल 
डोळे भरून येतील
तू सावरलंस तरी..
कदाचित समोरचा आरसा?
तो मात्र हुंदका देईल..
आता तिथे थांबू नकोस
आरशातही बघू नकोस
तसही तो तुला सांगणार नाहीच

आता तू कशी दिसतेस !!!!


-©प्रशांत शशिकांत शेलटकर
   8600583846

धर्म आणि त्याचे अनुयायी...

धर्म आणि त्याचे अनुयायी...

माणसाच्या प्रवृत्ती आणि विकृती धर्माच्या पलीकडच्या असतात त्या बदलायला धर्म देखील असमर्थ ठरतो. म्हणून धर्म बदलला म्हणून वृत्ती बदलतेच असे नाही. ज्याची वृत्ती सज्जन असते तो कोणत्याही धर्मात असेना तो सज्जनच असतो. सगळेच भारतीय धर्म मानवता सांगतात. इतर परदेशातून आलेल्या   धर्माचा माझा अभ्यास नाही आणि जिथे अभ्यास नाही तिथे व्यक्त होणे चूक आहे असे माझे मत आहे.
      काही विकृत प्रथा धर्माला बदनाम करतात म्हणून तो अखंड धर्म किंवा पंथ वाईट नसतो. एखादा धर्म त्या माणसाच्या वर्तनावर किती चांगला प्रभाव टाकतो याच्यावर त्या धर्माची नाही तर त्या माणसाचीच गुणवत्ता सिद्ध होते. अत्यंत उच्च प्रतीचे तत्वज्ञान सांगणारे धर्म त्यांच्याच अनुयायांना झेपत नाहीत मग ती माणसे त्या धर्मालाच निम्न पातळीवर आणून सोडतात.
     होमोसेपियन लेव्हल पासून सुरू झालेला माणसाचा प्रवास अखंड चालू आहे. सर्व तऱ्हेच्या उन्नत अवस्था काही ठराविक माणसांना प्राप्त होतात त्याना आपण प्रेषित म्हणतो इतकंच. सामान्य माणूस त्या उन्नत माणसांच्या प्रभावात येतो पण त्यांची उन्नत अवस्था प्राप्त करणे सर्वाना शक्य होत नाही.तो कर्मकांडांच्या प्रभावात राहतो. प्रत्येक पंथाचे कर्मकांड वेगळे असते तरी ते असते हेच महत्वाचे.. तू तुझे कर्मकांड सोड आणि माझे कर्मकांड स्वीकार हा एक विनोदी तितकाच केविलवाणा विरोधाभास असतो. आणि हे विरोधाभास,या विसंगती, हे वाद-विवाद जगाच्या अंतापर्यंत चालू रहाणार. विश्वाची उत्पत्तीच परस्परविरोधी तत्वातून निर्माण झाली आहे .आणि माणूस हा विश्वाचाच अविभाज्य भाग असल्यामुळे परस्परविरोधी विचारांचे प्रतिबिंब मानवी वर्तनात,व्यवहारात पडणे साहजिकच आहे

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday 21 November 2022

बाकी इतिहासाची...

इतिहासाची बाकी...

स्वातंत्र्य लढ्याचा अर्थ इतकाच की काही जण स्वराज्यासाठी लढत होते तर काही जण सुराज्यासाठी दोन्ही आघाड्या तितक्याच महत्वाच्या होत्या.फरक हाच होता की स्वराज्यलढा हा सत्तेला थेट आव्हान असल्याने स्वराज्यासाठी जे लढत होते त्यांच्यावर ब्रिटिशांचा रोष असणे साहजिक होते. आणि जे सुराज्यासाठी लढत होते त्यांच्यावर प्रस्थापित समाजाचा रोष असणे नैसर्गिक होते..
     काहीही असो त्या काळात जे काही झालं त्याविषयी टोकाच्या भूमिका घेऊन मतप्रदर्शन करणे चूक आहे. आणि मत असणे हे सुद्धा ठाम असण्याची शक्यता नसते ,  इतिहासाची लिखित साधने पण कितपत विश्वासार्ह असतील तेही सांगता येत नाही, कधी पूर्वग्रह ठेवून तर कधी व्यक्तीगत अनुभवाच्या प्रभावाखाली येऊन लेखन झाल्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. तरी देखील लिखित साधने हे इतिहास समजून घेण्याचे महत्त्वाचे साधन असल्याने ते नाकारून चालत नाही. 
      मानवी इतिहासाचे ताणेबाणे एकमेकांत गुंतल्या मुळे.. कोणती तरी एक तळी उचलून बाजू घेण्यात अर्थ नसतो. कोणाला तरी नायक आणि कोणाला तरी खलनायक करून काढलेले निष्कर्ष फार तर मनोरंजक, आकर्षक असतील पण ते सत्याचे यथार्थ आकलन असणार नाही. दोन अधिक दोन बरोवर चार हे निष्कर्ष गणितात ठीक असतात. पण इतिहासातील कोणतेही घटना काढा त्याला अनेक संदर्भ आणि मानवी वृत्ती चिकटलेल्या असतात.त्यामुळे इतिहासाला कधीच पूर्ण भाग जात नाही बाकी ही उरतेच..
      आपले मत बदलते ठेवण्यातच भलाई असते. अभ्यासाच्या प्रेमात पडावे, मतांच्या आणि लेखकाच्या नव्हे.

- प्रशांत शेलटकर
8600583846

प्रमुख पाहुणे

प्रमुख पाहुणे...

सभे मध्ये काही वेळा एखादा वक्ता प्रमुख पाहुण्यांची इतकी स्तुती करतो की अस वाटत की आता हा थोड्या वेळाने स्टेज वर गांडूळा सारखा वळवळायला लागेल..अतिथी किंवा प्रमुख पाहुणे यांचे कौतुक करणे अतिथी धर्माला साजेसे असतेच पण अति झाली की त्याची माती होते. आताच एक पेपरमधली बातमी वाचली.....सहकार कोळून प्यालेले नेते वगैरे वगैरे...जीवनात अस कोणतेही क्षेत्र नाही की जे कोणाला परिपुर्ण समजलं आहे. कोळून पिणे हा शब्दप्रयोग खाजगी  संवादाच्या वेळी ठीक असतो पण व्यासपीठावर बोलताना वक्त्याला भान असले पाहिजे. कौतुक करताना वास्तवाचे भान सोडू नये.
       काही वेळा इतकी अतिशयोक्ती होते की प्रमुख पाहुणे आणि श्रोते दोन्ही ओशाळून जातात, प्रमुख पाहुणे काय चीज आहे हे खूप वेळा श्रोत्यांना आणि खुद्द त्याना माहीत असते. प्रमुख पाहुणे कितीही भ्रष्टाचारी ,उर्मट,माजोरडे असले तरी एकदा का स्टेज वर आले की एकदम निस्पृह, स्वच्छ आणि अत्यंत विनयशील व्यक्तिमत्त्व बनून जातात. त्यांच्याकडून काही लाभ घ्यायचे असतील तर हमखास असे होतेच..विशेषतः राजकीय सभा अशाच असतात. अशा सभे मध्ये स्टेज वर पुष्पगुच्छाच्या  पलीकडे बसलेली व्यक्ती सहकार सम्राट,शिक्षणमहर्षी,लोकनेते, अजातशत्रू, लाडके व्यक्तीमत्व, भाई,दादा,  वगैरे वगैरे असतात..स्तुतीचे एखादें वाक्य टाकले की पाहुण्यांकडे प्रेमाने पाहण्याची पद्धत असते ,पाहुण्यांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा किती ताणली जातेय त्यावर पुढचे बरेच काही अवलंबून असते प्रमुख पाहुण्यांची अशी वारेमाप स्तुती झाली की समजून जायचं की आयोजकांचे काही ना काही स्वार्थ आहेत . 

     असो..अतिशयोक्ती असू नये.सभेचे सूत्रसंचालन करणारा हा स्तुती पाठक न वाटता सुत्रसंचालकच वाटला पाहिजे इतकेच...

-प्रशांत शेलटकर
 860058346

आता थाम्ब..

आता थांब...

कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

कधी काळी होतो आपण
कुणाचे ना कुणाचे तरी..
आता मात्र कुणाचेच नाही
हे वेळीच उमगलं पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे.. 

कलंदर आणि बिलंदर
आयुष्यात भेटायचेच
गोड बोलून गळा कापणारे
कुणीतरी असायचेच
कलंदर कोण ? बिलंदर कोण?
वेळीच हे समजले पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

प्राधान्य क्रम असतात ना 
प्रत्येकाचे वेगळे वेगळे
सोयीनुसारच वागतात ना
ते  सगळे सगळे
सालं लोकांच्या मनात नेमकं काय
ते एकदा समजलं पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

लोक पण इतके हुकमी वागतात
कधी उंटासारखे तिरपे चालतात
कधी अडीचकीचे घोडे बनतात
कधी तर प्यादालापण चाल देतात
आपण कोण उंट घोडे की वजीर 
हे क्लिअर कट समजलं पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

हसरे मधाळ मोहक  वगैरे वगैरे
असतात म्हणे हल्ली चेहरे
आणि कित्येकदा असतात ना
आपल्यावर अदृश्य पहारे..
हे चेहरे आणि ते पहारे
एकदा समजून घेतले पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

गर्दीचेच व्यसन असते आजकाल
बुळबुळीत माणसाची गर्दी
मूळमूळीत माणसांची गर्दी
पिचकलेल्या माणसांची गर्दी
विचकलेल्या माणसाची गर्दी
भरकटलेल्या माणसांची गर्दी
विस्कटलेल्या  माणसांची गर्दी
आणि पिंडाभोवती जमलेल्या 
खरकट्या कावळ्याचही गर्दी
साली ही गर्दीची नशा 
एकदातरी समजली पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Friday 18 November 2022

शिशिर

शिशिर

अंधाराची ओढून चादर
गुडूप झोपली पहाट मात्र
निपचित पडली गात्र तरी
श्वास निरंतर चालती मात्र...

झाडांचेही तेच ते प्राक्तन
ती ही उभीच गेली गारठून
पाना-पानात त्यांच्या हिरव्या
शिशिर कधीचा गेला ओघळून

इथे कुणाला निमित्त पुरले
विळखे आणखी घट्ट झाले
अन घट्ट मिठीत कुणा कुणाचे
सृजनाचे रम्य ,सोहळे रंगले...

पान- पातेरा जमवून कोणी
शेकोटीचा खेळ मांडती
धगधगत्या ज्वाळेकडे ते
एकटक मग उगाच पाहती

चहा उकळतो कुठे गाडीवर
वाफ त्याची दिसते सुंदर
घोट घेता अलगद त्याचा
रम्यच क्षण तो भासे खरोखर

"यंदा थंडी जास्तच आहे"
कोणी बोलतो उगाच काही
मग वाफाळती तोंडे देती
उगाच दुजोरा त्यालाही...

हा शिशिर सांगतो काही
ऐका मित्रानो निवांत
झाला कितीही आकांत
तरी आत असावे शांत

ही विपश्यना निसर्गाची
मौनात खोल जाण्याची
गोठल्या संवेदना तरीही
आत वसंत जपण्याची
.
.
गोठल्या संवेदना तरीही
आत वसंत जपण्याची...


-@प्रशांत शेलटकर
   8600583846

Sunday 13 November 2022

डोहाळे जेवण

डोहाळे जेवण...

आले भरत दिवस
पडे कसली ग भूल
गोड धक्के पोटामध्ये
बाळ देतो ग चाहूल

कसे असेल ग ते
माझे गोड गोड बाळ
ते असेल का शांत
की असेल ते वादळ

कोणासारखे असेल ते ?
त्याच्या बाबा सारखे?
की बाळ असेल ग 
थेट माझ्या सारखे?

बाबा म्हणेल की?
म्हणेल प्रथम ते आई?
प्रश्न पडतो मला
सारखाच ग बाई 

बाळा तुझ्या स्वागताची
किती केली रे तयारी
तुझ्या आगमनाची
वाट पहातात सारी

ये हसत जन्माला
दोन जन्म एका वेळी
एक बाळ म्हणून तुझा
एक आई मी वेगळी

आता जन्माला येईल
माझा सावळा ग कान्हा
रूप पाहता गोजिरे
मला फुटेल ग पान्हा

किंवा येईल ग माझी
सोनूली माझी राणी
मन आईचे ग गाते
बालजन्माची ग गाणी

आज डोहाळे जेवण
तृप्त आत हो रे बाळा
घास चिऊचा भरवीन
जेव्हा जन्मा येशील तू बाळा
जेव्हा जन्मा येशील तू बाळा

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Saturday 12 November 2022

काऊ..

एका झिम्माड दिवशी
काऊ चिंब भिजला
घरट्यापाशी चिऊच्या
दारातच तो थाम्बला

दार उघड चिऊताई
मी तुझा ग काऊ
भिजलो नखशिखांत
आता कुठे जाऊ?

होऊन जरा कोरडा
घेईन चहा जरासा
पाऊस थांबे पर्यंत
दे ग जरा आडोसा

काऊ भिजला कितीही
चिऊताईस माया नाही
जपते बिचारी स्वतःला
भरवसा कुणाचा नाही

पण तोडायचे कसे 
मन कावळ्याचे ते
म्हणून सांगत राहिली
ती वेगळेच बहाणे

म्हणाली थाम्ब जरा
मी आहे थोडी बिझी
पिल्ले बाथ टबात
खेळतात रे माझी

त्याना पुसून घेते
लावते गंध टिकली
थाम्ब तू जरासा
घाई नाही रे चांगली

कावळा म्हणाला,
चिऊ ताई ठीक आहे
आवर तुझे निवांत
मी मोकळाच आहे

असे कित्येक बहाणे
चिऊताई ने मग केले
भिजतच कावळ्याला
तिने दारातच ठेवले

वाट पाहून थकला
काऊ उडून गेला..
पण जाता जाता तिला
बोल सुनावून गेला

ऐक ग नीट चिमणे
मी चिऊताई म्हणतो.
भावा विषयी मनात ना
का संशय मनी दाटतो

मी असेन ग काळा 
पण मन नाही माझे काळे
नदी किनारी बघ जरा
टपले किती शुभ्र बगळे

दिसण्यावरून कुणाला 
तू नको धिक्कारू
अन फक्त रंगावरून
नको कोणा स्वीकारू

बोल बोलून हिताचे
काऊ उडून गेला..
दार उघड चिऊताई
कधीच ना पुन्हा म्हणाला

-प्रशान्त

Wednesday 9 November 2022

पुस्तक...

पुस्तक....

एखादे पुस्तक वाचावे ना 
तसे स्वतःला वाचत सुटावे..
कधी प्रश्न करावे कधी उत्तरावे
पण अखंड वाचत सुटावे..

काही पाने हसवणारी
काही पाने रडवणारी
काही तर अगदीच
भयव्याकुळ करणारी
नकळत आपले डोळे टिपावे
पण,एखादे पुस्तक वाचावे ना 
तसे स्वतःला वाचत सुटावे..

काही पाने हसरी
तर काही दुखरी
काही रटाळ अगदी
काही अगदी साधी-सुधी
वाटले क्षणभर रेंगाळावे
तर जरूर थांबावे...
पण , एखादे पुस्तक वाचावे ना 
तसे स्वतःला वाचत सुटावे..

पांढऱ्यावरती  नेहमीच काळे
नसते ना नेहमी नेहमी
अक्षरांना रंग गुलाबी
येतो ना कधी कधी...
मग त्या अक्षरांचे 
हलके अलगद चुंबन घ्यावे
पण, एखादे पुस्तक वाचावे ना 
तसे स्वतःला वाचत सुटावे..

आयुष्याच्या या  पुस्तकाला 
कोण जाणे किती पाने
पुढच्या पानावर काय लिहिले
हे  तो एक विधाताच जाणे
किंचित करून बोट ओले
एकेक पान पलटत रहावे
एखादे पुस्तक वाचावे ना 
तसे स्वतःला वाचत सुटावे..
कधी प्रश्न करावे कधी उत्तरावे
पण अखंड वाचत सुटावे..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...