Sunday 28 July 2024

यशश्री शिंदे च्या निमित्ताने

यशश्री शिंदे च्या निमित्ताने..

अपवाद वगळता,सध्याची तरुण पिढी स्वतःच्या विश्वात रमणारी आहे..ती करिअरिस्ट असल्याने ती त्यासंबंधीच विषयावर फोकस करत रहाते.. ती अवांतर वाचन करत नाही..ती पेपर वाचत नाही,न्यूज ऐकत आणि पहात नाही..समाजाशी काही देणे घेणे नाही..घरात सामाजिक विषयावर चर्चा नाही.  ही पिढी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते पण इंस्टा सारख्या माध्यमावर सामाजिक विषय येतच नाही. आणि अशा मुलांचे फ्रेंड सर्कल त्यांच्याच वयाचे असल्याने त्यांचे विश्व वास्तवापासून दूर असते. 

पालक आणि मूल यांचा संवाद तुटत जात आहे..जर घरात मुलांशी संवाद नसेल ,दुरावा असेल तर मुलं अन्य ठिकाणी प्रेम वगैरे शोधते. पालक आणि मुले यांच्यात संवाद नाही कारण पालक आपल्या विश्वात रमलेले असतात ते काळाच्या गतीबरोबर चालत नाहीत.त्यामुळे मुलांचे आणि त्याचे विचार मेळ खात नाही. बदलत्या काळाबरोबर मुले अडजेस्ट करतात.पालकांना ते कठीण जाते.
     पालक आणि मूल यांच्यात संवाद होत नाही याचे कारण  मुलांच्या प्रश्नांची उत्तरे पालकांकडे नसतात .." गप बस्स" हे काही सगळ्या प्रश्नावरचे उत्तर नाही.किंबहुना कोणत्याच प्रश्नावरचे नाही..मुळात पालकच स्वतःला अपडेट ठेवत नाहीत.वयात येणाऱ्या मुलांचे समुपदेशन पालक या नात्याने केलं पाहिजे. हल्ली शाळेतून केले जाते पण ते बहुधा मुलींचे असते.मुलांचे समुपदेशन जास्तच गरजेचे आहे.ते होत नाही मुलांना गृहीत धरले जाते.हा शालेय पातळीवरचा एक सूक्ष्म लिंगभेद म्हणावा का?
     मुलगा आणि मुलगी हा भेद कुटुंबाच्या पातळीवर केला जातो ,पण हल्ली बहुधा सिंगल चाईल्ड जास्त असल्याने.मूल ओव्हर प्रोटेक्टेड असण्याची शक्यता जास्त असते.मूल ज्याची मागणी करते ते तात्काळ दिल्यामुळे नकार स्वीकारायची सवय लागतच नाही. मग तेच मूल मोठ्या वयात नकार पचवू शकत नाही.
      लैंगिक समुपदेशन ही काळाची गरज आहे, " " मोबाईल वर एका क्लिक वर पोर्नसाईट्स उपलब्ध आहेत.त्या पालकांना मोहात पाडू शकतात तर मुलांचे काय..."आपोआप कळेल" भ्रमातून पालकांनी बाहेर येणे गरजेचे आहे. चुकीच्या गोष्टीच आपोआप कळत जातात. या बाबतीत आई जर मुलीची मैत्रीण बनली तर समुपदेशन घरच्या घरी होऊन जाईल.त्यामुळेच मुलं आणि पालक यात संवाद असणे आवश्यक आहे.सोशल मीडिया हा अल्लाउद्दीन चा दिवा आहे ,कधी आणि कुठे घासायचा हे कळायला हवं..

- प्रशांत शेलटकर
  8600583846

Saturday 27 July 2024

त्या तिथे पलीकडे..

त्या तिथे पलीकडे....

कल्पना या बुद्धीच्या अधीन असतात.बौद्धिक आकलनाच्या पलीकडे कल्पना जात नाहीत.एलियनला मानवसदृश्य चेहरा देणे हा माणसाच्या बौद्धिक  कक्षेचा परीघ आहे. परग्रहावरील मानव आपल्यासारखाच असेल,त्याला डोळे असतील ,कान असतील..तो ऑक्सिजन घेईल आणि कार्बनडाय ऑक्साईड सोडत असेल,त्याला पाण्याची गरज असेल आणि त्या हिशेबाने त्याचे अवयव असतील ही मानवी कल्पनेची झेप ,मानवी बुद्धी निश्चित करते.
    परग्रहावरील जीव मानव सदृश्यच असण्याची गरज नसते.मंगळावर पाण्याचे साठे असतील तरच तिथे जीवसृष्टी असू शकेल हे गृहीत देखील असेच संदिग्ध आहे. पाणी ही पृथ्वीवरच्या मानवाची गरज असते,परग्रही मानवाचे बॉडी स्ट्रक्चर वेगळे असू शकते त्याच बरोबर त्याच्या बेसिक रिक्वायरमेंट वेगळ्या असू शकतात.
     पण काहीतरी गृहीत धरल्या शिवाय विज्ञानदेखील पुढे जात नाही.एलियनला मानवी चेहरा दिला नाही तर त्याचे आकलन होणे कठीणच.जो कधी दिसला नाही,जाणवला नाही ,ज्याने त्याच्या अस्तित्वाची अनुभूती दिली नाही त्या एलियनचे चित्र तयार होते.त्याच्यावर चित्रपट येतात. म्हणजे माणूस कायम शास्त्र काटयाची कसोटी लावून जगू शकत नाही.तसा जगत राहिला तर बौद्धिक ताण येऊन तो एकतर वेडा होईल अथवा मरून जाईल. हाच ताण रिलीज करायला कल्पनेचा सेफ्टी व्हॉल्व दिलेला असतो. देव हा असाच एक सेफ्टी व्हॉल्व आहे.तो ताण रिलीज करतो.जो पर्यंत त्याला पर्याय येत नाही तोपर्यंत तो रहाणार. तो ही त्याच्या भल्या बुऱ्या परिणामांसकट...

  -© प्रशांत शेलटकर®

Sunday 21 July 2024

तनाचे श्लोक..

तनाचे श्लोक..🤣

तना सज्जना त्त्वां
पाऊल जपून टाकावे
अन्यथा नकळत पुढे
स्वमुखावर आदळावे

तना सज्जना बघ जरा
अंगणात फरशी निसरडी
चालताना अखंड असावे
सावचित्त हरघडी..

तना सज्जना
सरकता हे किंचित पाय
थेट आदळतात कुल्ले
आठवते मग माय

तना सज्जना
पाऊस खिडकीतून पहा रे
उगा प्रत्यक्ष भिजण्याचा
वृथा शौक नको रे..

तना सज्जना,
उसने तारुण्य नको रे
अन उरलेल्या दिवसात
उगा कारुण्य नको रे

तना सज्जना
राम घरात बसून म्हणा रे
अवेळी अकाली 
रामनाम सत्य नको रे

-प्रशांत

🤣🤣

Thursday 18 July 2024

रेजातला पाऊस..

रेजातला पाऊस...

खिडकीच्या रेजापलीकडचा
अखंड..अविरत पाऊस
तो एकटक पहात बसतो...
त्याच्याही डोळ्यात..
आषाढ दाटून आलाय…
तरीही तो पहातोय
रेजापलीकडला एकटक पाऊस

पलीकडच्या वळणावर
एक ठिपका येताना दिसेल
तीच असेल का?
त्याच्या डोळ्यात भरलेलं आभाळ
त्याचे रेजावरचे हात घट्ट होतात
रेजातला पाऊस अजून बेफाम

होय तीच ती..
फाटक्या छत्रीने आभाळ पेलणारी
दुसरी कोण असेल? आईशिवाय.
ठिपका जवळ येतो..
नव्हे वात्सल्य जवळ येते..
रेजातला तो धावत सुटतो..

रडवेलं अधीर बाल्य 
तिच्या वत्सल कुशीकडे झेपावत.
तिचा ओला चिम्ब हात
त्याच्या कुरळ्या केसात फिरत रहातो..

इतक्यात आभाळात लख्ख होतं
भिंतीवर लावलेला आईचा फोटो
क्षणभर उजळतो..
रेजाजवळ उभा राहू नकोस रे
काळजीचे आभासी स्वर

रेजा पलीकडचा पाऊस ..
आता अधिकच झालाय..
त्याच्या डोळ्यातून सुद्धा
आता आभाळ वहातेय..

रेजापलीकडचा पाऊस
आता उद्दाम झालाय.
आता छप्परही गळतय
आई नसल्यावर 
दुसरं काय होणार?
आता छप्पर गळणार
रेजापलीकडचा पाऊस
आता आत येणार..
आई नसल्यावर 
दुसरं काय होणार?

-© शशिकलाकांत

Wednesday 17 July 2024

माया..

माया म्हणजे नेमकं काय?...

आध्यत्मिक क्षेत्रातील माणसांच्या तोंडून माया हा शब्द ऐकायला येतो..जग ही माया आहे,संसार ही माया आहे, कुटुंब ,बायका मुले ही माया आहे..असे अनेक जण अनेकवेळा सांगत असतात..पण नेमकी माया म्हणजे काय.. गंमत म्हणजे प्रेमाचा समानार्थी शब्द पण माया असाच आहे. माया या शब्दाला इंग्रजी शब्द illusion अस आहे. 
       जे खरे वाटते पण खरे नसते ती गोष्ट म्हणजे माया..युधिष्ठिराला एकदा प्रश्न विचारण्यात आला की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? या प्रश्नाचे उत्तर देताना युधिष्ठिर म्हणतो, की आजूबाजूला मृत्यू घडत असतानाही माणसाला वाटत की ती वेळ माझ्यावर येणारच नाही हेच जगातलं सर्वात मोठं आश्चर्य..माया म्हणतात ती हीच..
    आता सायंटिफिक दृष्टीने पाहू..जेव्हा एखादी वस्तू आपण पाहतो तेव्हा तिचा आकार पहातो .प्रत्येक वस्तू कणांनी बनली आहे.प्रत्येक कण अणू -रेणुनी बनलेला आहे रेणूपेक्षा अणू सूक्ष्म .अणूचेही तीन भाग प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन..आणि हे इलेक्ट्रॉन स्थिर नसतात ते अणुकेंद्राभोवती वेगाने फिरत असतात.आता ही रचना प्रत्येक सजीव आणि निर्जिबाची असतेच. 
    साध्या डोळ्यांनी जेव्हा आपण खुर्ची पाहतो तेव्हा त्याचा निर्जीव आकार पहातो. सगळी खुर्ची जर सूक्ष्म दर्शकाखाली पहिली तर तिचा मूळ आकार जाऊन ती अणुनी बनली आहे आणि ती गतिमान दिसेल.केवळ खुर्चीच नव्हे तर सगळ्या निर्जीव वस्तू गतिमान दिसतील..
     जी गोष्ट निर्जीव वस्तू बद्दल तीच सजीवा बद्दल..माणूस सूक्ष्म रूपाने पहात गेलो तर तो सुद्धा कोट्यवधी पेशींनी बनला आहे..जसे जसे त्याला सूक्ष्म रूपाने पाहू तसे त्याचे रूप, रंग,तो स्त्री की पुरुष ह्या बाह्य गोष्टी लय पावून तो देखील अणु रेणुनी बनलेला आहे हे लक्षात येईल.थोडक्यात जसे जसे सूक्ष्मात जाऊ तसे स्त्री,पुरुष,प्राणी,आणि निर्जीव वस्तु यातले भेद नष्ट होवून सगळे जग एकाच मॅटर ने बनले आहे हे लक्षात येइल.. अध्यात्मात त्याला एक समर्पक शब्द आहे तो म्हणजे ..चैतन्य..
      सायन्स पार्टीकल अँड वेव्हज थिअरी मांडते. विश्व म्हणजे इनफिनिट एनर्जी मानते अध्यात्म म्हणते विश्व चैतन्यरूप आहे.सायन्स म्हणते काहीही नष्ट होत नाही ,रूपांतर होते.जसे पाण्याची वाफ होते,वाफेचे पाणी होते, वस्तू जळून कोळसा होतात. जे दिसत नाही ते वायुरूपात वातावरणात साठून राहाते. वस्तूचे आकार नष्ट होतात  पण ऊर्जा नष्ट होत नाही.अध्यात्म सांगत की शरीर नष्ट होते आत्मा नाही.( आत्मा म्हणजे भटकती आत्मा नव्हे..ते कल्पनेचे आणि सिरीयल आणि चित्रपटांचे आणि माणसाच्या मनाचे खेळ आहेत)
    सारांश- जसे दिसते तसे नसते,बघण्याची साधने बदलली की दिसणे बदलत जाते.हीच माया आहे ..मूळ चेतन समजून घेतले की माया नाहीशी होते..भेद नाहीसे होतात मग अवघाची रंग एकच होतो...

- प्रशांत शेलटकर..
-- टीप - लेखाच्या खाली दिलेले माझे नाव ही सुद्धा जगातल्या असंख्य देहांपैकी एक असलेल्या देहाची ओळख आहे..बाकी सगळे माया आहे
    वर उल्लेख केलेल्या सायंटिफिक माहितीत त्रुटी असू शकतात,जर असतील तर क्षमस्व , आणि त्यात सुधारणा स्वागतार्ह

Monday 15 July 2024

चिकित्सा..

ऐतिहासिक व्यक्ती या माणूसच असतात, द्वेष ,मत्सर,लोभ, राग त्यांच्यातही होते..पण त्यांची काही कार्य इतकी असामान्य असतात की ती कार्येच त्याना इतिहासात स्थान देतात. इतिहासाचा अभ्यास म्हणजे ऐतिहासिक व्यक्तींच्या प्रेमात पडून त्यांचे उदात्तीकरणं करणे नव्हे तसेच ऐतिहासिक व्यक्तींच्या चुका दाखवून त्याना पूर्णपणे खलनायक दाखवणे नव्हे.
    कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीवर जसे आंधळे प्रेम करू नये तसे आंधळा द्वेषसुद्धा करू नये. हे नायक - खलनायक चे खेळ थांबवून ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींची वस्तूनिष्ठ पद्धतीने चिकित्सा केली पाहिजे. डोक्यावर घेणे आणि पायदळी तुडवणे या दोन्ही गोष्टी टाळल्या तरच अभ्यासात तटस्थपणा येतो .अन्यथा लोकप्रिय होण्याचा मोह असेल तर लोकांना आवडेल तेच मांडायचा प्रयत्न चालू रहातो. लोकप्रिय असण्याचा आणि वस्तूनिष्ठ असण्याचा नेहमीच संबंध असेल असे नाही.
    शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्ती तत्कालीन उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्त ऐवजा वरून व्यक्त झालेल्या असतात, शिवाय त्या ज्या कुटुंबात जन्मलेल्या असतात तिथले संस्कार आणि पूर्वग्रह  यांचा पगडा त्यांच्यावर असतोच त्यानुसार त्या व्यक्त झालेल्या असतात. शंभर वर्षांपूर्वी लाखो माणसे जन्माला आली आणि गेली त्यातले काही शेकडा लोकांची आज शंभर वर्षांनंतर दखल घेतली जाते याचा अर्थ काहीतरी ठोस कार्य त्याच्याकडून झालेले आहे हे तर नक्की..आता हे जे कार्य झालय त्याची चिकित्सा आज उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार आणि लॉजिक नुसार झालीच पाहिजे. त्यानी केलेली चांगली कामे आणि चुकीची कामे एकाच वेळी मांडण्यात येणे म्हणजे वस्तूनिष्ठ इतिहास अभ्यासणे. दोष झाकून केवळ गुण सांगणे ,आणि गुण झाकून केवळ दोष सांगणे ,त्यांची जात वार विगतवारी करणे चूकच..एकाच वेळी गुणदोष मांडणे आणि बाकी सगळे समाजावर सोपवले  की समाजापर्यंत केवळ चांगल्या किंवा केवळ वाईट गोष्टी जात नाहीत.समाज व्यक्तीनिष्ठते कडून वस्तूनिष्ठते कडे जातो.

-प्रशांत शेलटकर..

Thursday 11 July 2024

कल्लोळ आणि शांतता

मित्रानो शांत रहा. वाद विवाद करून मतपरिवर्तन करायचे दिवस आता नाहीत. व्हाट्सप युनिव्हर्सिटी आणि बुद्धिभेद करणारी ग्रंथसंपदा यामुळे ब्रेनवॉश झालेल्या झोंबीचे मतपरिवर्तन केवळ अशक्य असते. माणसाना स्क्रीनचा चकवा लागला आहे त्यामुळे आजूबाजूला काय होतंय याचे भान त्याना नाही.
     माणस जे आवडत तेच वाचतात. जे आवडत त्याला पुराव्याची गरज नसते.कारण त्याला जे आवडत तेच सत्य असत.
    एक असत्य पुस्तक वाचून त्यावर आधारित शंभर असत्य पुस्तके येतात ,शंभराव्या पुस्तकाच्या मागे मागच्या नव्याण्णव  पुस्तकाचे संदर्भ असतात.नव्याण्णवावे पुस्तक वाचणाऱ्याला वाटते की केवढा मोठा व्यासंग आहे लेखकाचा 
    आउट ऑफ बॉक्स विचार करणे हे आपल्याला झेपत नाही .कारण तसा विचार केला तर आपला कम्फर्ट झोन तुटण्याची शक्यता असते.आयुष्यभर ज्यांचा राग केला अथवा ज्यांच्यावर प्रेम केल,त्यांच्याबद्दलचे वास्तव कळले की स्वतः केलेल्या चूका मान्य करणे अवघड जाते. म्हणूनच डावे आयुष्यभर डावे रहातात त्यांच्या दृष्टीने उजवे शत्रू असतात, उजवे आयुष्यभर उजवे रहातात त्यांच्या दृष्टीने डावे हे शत्रू असतात.असे उजवे आणि डावे कट्टर असणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली जाते.
      समाजात सरमिसळ असताना त्यात सर्वबाजुनी चांगल्या वाईटाची सर्व बाजूनी उलथापालथ होत असताना एकाच विचारांना चिकटून रहाणे, नायक आणि खलनायक अशी विभागणी करत रहाणे. एकांगी ग्रंथ निर्माण करणे,संघटना निर्माण करणे.आणि त्याचवेळी इतर विचारांना शत्रू समजणे,मनाची दारे बंद करणे, एकाच समुदायाला टार्गेट करणे हे हास्यास्पद नाही का? आणि या हास्यास्पद गोष्टी अभिमानाने मिरवणे हे त्याहूनही हास्यास्पद नाही का?
      मित्रांनो आपल्याला हव्या तशा पोस्ट कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड करणे सोपे असते.पण स्वतः लॉजिक वापरून चिंतन करणे खूप कठीण आणि चॅलेंजिंग असते.कितीही आवडता नेता असुदे ,लेखक असू दे,ग्रंथ असू दे त्याची चिकित्सा स्वतः करा..केवळ आपल्याला आवडणारे मटेरियल त्यात आहे .लिहिण्याऱ्याकडे सतराशे साठ डिगऱ्या आहेत..म्हणून ते स्वीकारू नका. पुस्तकातल्या प्रत्येक परिच्छेदाला थोडा विसावा घ्या ,लॉजिक लावा,नोटिंग करा.उलटे प्रश्न विचारा, ज्या काळाचा संदर्भ असेल तो लक्षात घ्या त्याची तुलना आजच्या वास्तवाशी करा. असे करत करत वाचन करा. पुस्तकाच्या मागे संदर्भ असेल तर तो क्रॉस चेक करा ,ती संदर्भिय पुस्तके वाचा...
    आता विचार करा ,आपण जे पोट भरण्यासाठी उद्योग करतो तो वेळ आणि आपला स्क्रीन टाइम यातून एवढ सगळं करायला वेळ मिळतो का?मग आपण काय करतो जे रेडिमेड असते आणि जे आवडते ते उचलतो आणि सोशल मीडियावर फेकून देतो ,मग त्यावर वाद -प्रतिवाद ,भांडण ..मित्र दुरावणे ..
     त्यापेक्षा शांत रहा.. सुकून ही सुकून..☺️☺️

-प्रशांत कलाकांत

Wednesday 10 July 2024

तिसरा डोळा-पुस्तक..

मनातल्या सुखद आणि दुःखद भावनांना एखादे पुस्तक वाट करून देते मग ते पुस्तक आणि तो लेखक आवडायला लागतो. आपल्या भावनेशी जुळणारे लेखन प्रत्येकालाच आवडते..
     पण यात एक वेगळीच गंमत असते, मी केवळ मला आवडणाऱ्या,माझ्या मताशी आणि मनाशी जुळणारी पुस्तकं वाचत गेलो तर माझेच जग खरे वाटायला लागते. पण इतपत ठीक आहे पण माझेच जग खरे हे वाटायला लागणे धोकादायक.. त्यातून वैचारिक गुलाम (झोंबी) निर्माण होतात. स्वतःचे लॉजिक हरवते लेखकाचे लॉजिक खरे वाटायला लागते.तिथून पुढे व्यक्ती पूजा निर्माण होते.
      वाचकाला आपल्याच पद्धतीने विचार करायला लावणे हे लेखकाचे मोठे यश असते.यालाच ब्रेनवॉश म्हणतात. "स्वतःला" शाबूत ठेवून वाचणे अवघड असते. पण परस्पर विरोधी वाचायची सवय असेल तर मजकूराला आपोआपच फिल्टर लागतात. प्रश्न निर्माण होत जातात. धार्मिक पुस्तक वाचताना अस होतच पण वैज्ञानिक पुस्तके वाचताना सुद्धा हे फिल्टर लागतात.नव्हे ते लागलेच पाहिजे.
     परस्पर विरोधी वाचन केले की  विचार करण्यात सुद्धा समतोल येतो ..कुठलंही एक टोक गाठलं जात नाही. दुर्दैव असे आहे की एकतर्फी मांडणी करणारे लोकप्रिय होत आहेत कारण ते लोकांच्या मनातलं बोलत आहेत. सत्य सांगणे या पेक्षा लोकानूनय करणे सोपे असते.ब्लॅक अँड व्हाईट मांडणी कळायला सोपी असते. आणि जे सोपं आहे ते लिहिलं की ते लोकप्रिय होत.आणि असे लिहिणारे सुद्धा लोकप्रिय होतात..
     इतिहास अभ्यासताना तर वेगळीच गंमत असते,एक तर तो शंभर हजार वर्षा पूर्वी घडून गेलेला असतो ..जसे जसे संशोधन होत जाते तसा तसा तो उलगडत जातो.पण आम्हाला नायक आणि खलनायक ठरवायची इतकी घाई असते की सगळे संशोधन पूर्ण झाल्यासारखे  अंतिम  निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. कारण इतिहासात ल्या चुकांचे खापर कोणावर तरी फोडायची घाई झालेली असते.
    आज प्राचीन संस्कृत व पाली  भाषा थेट व्यवहारात नाहीत त्यामुळे आपण त्या भाषांशी तितके संलग्न नाही, जे कोणी लोक भाषांतर करतात त्यांच्यावर आपण पूर्ण अवलंबून असतो. त्या भाषांतरावर भाषांतरकाराचा अभ्यास ,व्यासंग, त्याचे पूर्वग्रह त्याचा प्रदेश ,त्याचे आकलन ,मूळ संस्कृत किंवा पाली शब्दाचे त्याने लावलेले अर्थ या सर्वांचा परिणाम होतो, आणि तोच परिणाम भाषांतर वाचणाऱ्यावर होतो , आपण जेव्हा इतरांना पुस्तकांचे संदर्भ देतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतले पाहीजे की संदर्भ दिले म्हणजे ते सत्यच असले पाहिजे असे नाही.
     स्वतंत्र बुद्धीने आपणही कधीं तरी विचार केला पाहिजे.फुलबाजासारखी आतषबाजी करण्यापेक्षा पणती सारखे मंद तेवत राहिले पाहिजे.

-प्रशांत शशिकलाकांत

8600583846

Monday 8 July 2024

आई

आई..

आईला जपा रे
ती गेली की 
केवळ हुंदक्यात
उरते ती..
ती गेली की
हसण्याचा केवळ
अभिनय करावा लागतो..
जगरहाटी म्हणून
करत रहातो आपले 
दैनंदिन व्यवहार
पण मायेची नाळ 
तुटल्याचा सल
कायम राहतो..
सलत मनात..
म्हणून आईला जपा रे

वय झालय तीच..
तुम्हाला वाढवता वाढवता
तीचंच एक लहान मूल झालय
तुम्हाला मोठं करता करता
ती चिडचिड करते
ती रागवते..
विस्मरण होत तिला हल्ली
पण तुम्ही चिडचीड करू नका रे
ती एकदा गेली की
परत येत नसते रे
म्हणून आईला जपा रे

तिची वेळ आली
की ती जाईलच..
सरणावरचे पार्थिव
जळतच राहील.
तेव्हा तुम्हाला उमजेल
ती आयुष्यभर जळत होती
तुमच्यासाठी केवळ
केवळ तुमच्या साठी
मग कितीही रडलात
तरी ती परत येत नसते रे..
म्हणून ती असते तो पर्यंत
आईला जपा रे...

प्रशांत शशिकलाकांत

देव ही एक न्यूट्रल व्यवस्था

देव ही एक न्यूट्रल व्यवस्था आहे ती कोपही करत नाही आणि कृपाही..अस वामन राव पै म्हणतात.. आणि ते पटते देखील.. पुढे ते असंही म्हणतात की माणसाच्या कर्मानुसार नियती बनते..काहीवेळा असंही होत की काही कारण नसताना अपल्याला चांगले किंवा वाईट फळ मिळते ..मग आपण म्हणतो हे नशिबाने मिळाले.पण ते नशिबाने मिळत नसते तर कार्य कारण भावाने मिळते.विज्ञान पण हेच सांगते की प्रत्येक घटनेमागे कार्य कारण भाव असतोच मग एकाच कुटुंबातील ,एकाच वातावरणात वाढलेली ,सारख्याच सुविधा असलेल्या दोन भावंडांपैकी एक शिकते आणि प्रगती करते पुढे जाते आणि एक मागे रहाते अस का? बुद्धी? की मिळालेल्या संधी? त्यात खोल जाऊन विचार केला तर ती त्या गोष्टी भिन्न का असतात..संधी मिळणे आणि ती मिळवणे यात सूक्ष्म फरक आहेच पण हे मिळवणे देखील पूर्ण सत्य असते का? केवळ स्वकर्तुत्वाने पुढे जाणे अशक्य असते..यश मिळायला योग्य वेळी योग्य माणसे आयुष्यात यावी लागतात. ते आपल्या हातात नसते..तरी पण ती माणसे कोण त्या प्रेरणेने जवळ येतात..?केवळ कुशाग्र बुद्धी असलेली मुले ऐहिक प्रगतीत मागे पडतात..काय कारण असेल? जसे कर्म तसे तसे फळ असेल तर ते कर्म करण्याची बुद्धी कुठून येते? आज त्या बुद्धीला नियंत्रित करणारे संस्कार कुठून येतात? आणि घरात सुसंस्कृत वातावरण असतानाही मुलं का बिघाडते आणि कसलेच सुसंस्कारित वातावरण नसताना एखादे मूल उत्तम निपजते? चार पाच वर्षांचे मूळ अद्भुत गाते,पेटी तबला वाजवते हे कसे शक्य होते?..हे संचित कुठून येते? आयुष्यांच्या ताळेबंदातली आरंभीची शिल्लक म्हणजे पूर्वसंचित ...पुनर्जन्म मानल्याशिवाय वरील प्रश्नांची संगती लागत नाही. 
    विज्ञाननिष्ठ विचार पद्धतीने पुनर्जन्म सिध्द होत नाही कारण विज्ञान हे मानवी मेंदूच्या अधीन आहे ,मेंदूला त्याची मर्यादा आहे.त्या पलीकडचे तो मान्य करत नाही. त्यामुळे वरच्या प्रश्नाची उत्तरे विज्ञान देणार नाही ..भूगोलाचे शिक्षक गणिताचे प्रश्न सोडवत नाहीत आणि गणिताचे शिक्षक भूगोल शिकवत नाही.
    बरे विज्ञान असे म्हणतो की जे दिसते ,जे जाणवते तेच सत्य ,आणि ते सत्य एकाच नव्हे लाखो माणसाला दिसले आणि जाणवले तरच ते सत्य..गंमत अशी की कुत्र्याला श्रवणातीत ध्वनी ऐकू येतात ,माणसाला ठराविक डेसीबल च्या पलीकडे आणि अलीकडे ऐकू येत नाही. घुबड अंधारात पाहू शकतो माणूस नाही.म्हणजे मानवी मेंदूला जाणवते तेच सत्य नसते.अशा अनेक गोष्टी असतील की ज्या मानवी मेंदूच्या क्षमतेच्याबाहेर आहेत. माणूस आणि त्याचा मेंदू सतत उत्क्रांत होत आहे त्यामुळे भविष्यात कदाचित पुनर्जन्म सिद्धही होईल..सध्या केवळ लॉजीकचा वापर करायचा..
 ( टीप - विज्ञानाला अजिबात कमी समजण्याच्या हेतू नाही.हे मी जे टाईप करतोय तो मोबाईल विज्ञानाचीच देणगी आहे. आपल्याकडे पूर्वी सर्व ज्ञान होते ही अंधश्रद्धा देखील नाही. आपण खूप चुकाही केल्यात भूतकाळात पण प्रवास चालू आहे घाईघाईने निष्कर्ष काढणे धोक्याचे आहे.जशा जशा गोष्टी उलगडत जातील तशा जुन्या धारणा निघून जातील..नवीन निर्माण होतील.. जुन्याला निरोप देऊ नव्याचे स्वागत करू)

-प्रशांत शशिकलाकांत

Wednesday 3 July 2024

कविता..

कोणी न केले कौतुक
तरी निराश जराही न व्हावे
"अमुकतमुककार" म्हणुनी
तरी स्वतःलाच मिरवावे

जमवावे सभोवती मंदबुद्धी
उरूस करावा साजरा..
झगझगीत इव्हेंट करुनी
झेलाव्या कौतुक नजरा

त्याच वेदना तेच रडगाणे
त्याच त्याच सुरात गावे
धाय मोकलून रडतील असे
रसिक खास जमवावे

पदवी द्यावी लोकांनी
ते दिवस आता सरले
सत्कार करवून घेण्याचे
हे दिवस आता आले

छन्दा मध्ये न जमले
तर शब्द द्यावे विखरून
मुक्तछंद म्हणोनी त्यास
नाव द्यावे ठोकोनी

अज्ञ लोक करती इथे
अज्ञांचाच सत्कार..
अज्ञ वाजविती टाळ्या
अज्ञच करती चित्कार

हिरे म्हणून खपतात
इथे दगड धोंडे
ध्वजाचा पत्ताच नाही
उगाच मिरविती दांडे

कविता खरे तर
देवघरचेच देणे..
कुठेही कसेही नसते
उमलून येत असते  गाणे

-प्रशांत