Monday 8 July 2024

देव ही एक न्यूट्रल व्यवस्था

देव ही एक न्यूट्रल व्यवस्था आहे ती कोपही करत नाही आणि कृपाही..अस वामन राव पै म्हणतात.. आणि ते पटते देखील.. पुढे ते असंही म्हणतात की माणसाच्या कर्मानुसार नियती बनते..काहीवेळा असंही होत की काही कारण नसताना अपल्याला चांगले किंवा वाईट फळ मिळते ..मग आपण म्हणतो हे नशिबाने मिळाले.पण ते नशिबाने मिळत नसते तर कार्य कारण भावाने मिळते.विज्ञान पण हेच सांगते की प्रत्येक घटनेमागे कार्य कारण भाव असतोच मग एकाच कुटुंबातील ,एकाच वातावरणात वाढलेली ,सारख्याच सुविधा असलेल्या दोन भावंडांपैकी एक शिकते आणि प्रगती करते पुढे जाते आणि एक मागे रहाते अस का? बुद्धी? की मिळालेल्या संधी? त्यात खोल जाऊन विचार केला तर ती त्या गोष्टी भिन्न का असतात..संधी मिळणे आणि ती मिळवणे यात सूक्ष्म फरक आहेच पण हे मिळवणे देखील पूर्ण सत्य असते का? केवळ स्वकर्तुत्वाने पुढे जाणे अशक्य असते..यश मिळायला योग्य वेळी योग्य माणसे आयुष्यात यावी लागतात. ते आपल्या हातात नसते..तरी पण ती माणसे कोण त्या प्रेरणेने जवळ येतात..?केवळ कुशाग्र बुद्धी असलेली मुले ऐहिक प्रगतीत मागे पडतात..काय कारण असेल? जसे कर्म तसे तसे फळ असेल तर ते कर्म करण्याची बुद्धी कुठून येते? आज त्या बुद्धीला नियंत्रित करणारे संस्कार कुठून येतात? आणि घरात सुसंस्कृत वातावरण असतानाही मुलं का बिघाडते आणि कसलेच सुसंस्कारित वातावरण नसताना एखादे मूल उत्तम निपजते? चार पाच वर्षांचे मूळ अद्भुत गाते,पेटी तबला वाजवते हे कसे शक्य होते?..हे संचित कुठून येते? आयुष्यांच्या ताळेबंदातली आरंभीची शिल्लक म्हणजे पूर्वसंचित ...पुनर्जन्म मानल्याशिवाय वरील प्रश्नांची संगती लागत नाही. 
    विज्ञाननिष्ठ विचार पद्धतीने पुनर्जन्म सिध्द होत नाही कारण विज्ञान हे मानवी मेंदूच्या अधीन आहे ,मेंदूला त्याची मर्यादा आहे.त्या पलीकडचे तो मान्य करत नाही. त्यामुळे वरच्या प्रश्नाची उत्तरे विज्ञान देणार नाही ..भूगोलाचे शिक्षक गणिताचे प्रश्न सोडवत नाहीत आणि गणिताचे शिक्षक भूगोल शिकवत नाही.
    बरे विज्ञान असे म्हणतो की जे दिसते ,जे जाणवते तेच सत्य ,आणि ते सत्य एकाच नव्हे लाखो माणसाला दिसले आणि जाणवले तरच ते सत्य..गंमत अशी की कुत्र्याला श्रवणातीत ध्वनी ऐकू येतात ,माणसाला ठराविक डेसीबल च्या पलीकडे आणि अलीकडे ऐकू येत नाही. घुबड अंधारात पाहू शकतो माणूस नाही.म्हणजे मानवी मेंदूला जाणवते तेच सत्य नसते.अशा अनेक गोष्टी असतील की ज्या मानवी मेंदूच्या क्षमतेच्याबाहेर आहेत. माणूस आणि त्याचा मेंदू सतत उत्क्रांत होत आहे त्यामुळे भविष्यात कदाचित पुनर्जन्म सिद्धही होईल..सध्या केवळ लॉजीकचा वापर करायचा..
 ( टीप - विज्ञानाला अजिबात कमी समजण्याच्या हेतू नाही.हे मी जे टाईप करतोय तो मोबाईल विज्ञानाचीच देणगी आहे. आपल्याकडे पूर्वी सर्व ज्ञान होते ही अंधश्रद्धा देखील नाही. आपण खूप चुकाही केल्यात भूतकाळात पण प्रवास चालू आहे घाईघाईने निष्कर्ष काढणे धोक्याचे आहे.जशा जशा गोष्टी उलगडत जातील तशा जुन्या धारणा निघून जातील..नवीन निर्माण होतील.. जुन्याला निरोप देऊ नव्याचे स्वागत करू)

-प्रशांत शशिकलाकांत

No comments:

Post a Comment