Thursday 11 July 2024

कल्लोळ आणि शांतता

मित्रानो शांत रहा. वाद विवाद करून मतपरिवर्तन करायचे दिवस आता नाहीत. व्हाट्सप युनिव्हर्सिटी आणि बुद्धिभेद करणारी ग्रंथसंपदा यामुळे ब्रेनवॉश झालेल्या झोंबीचे मतपरिवर्तन केवळ अशक्य असते. माणसाना स्क्रीनचा चकवा लागला आहे त्यामुळे आजूबाजूला काय होतंय याचे भान त्याना नाही.
     माणस जे आवडत तेच वाचतात. जे आवडत त्याला पुराव्याची गरज नसते.कारण त्याला जे आवडत तेच सत्य असत.
    एक असत्य पुस्तक वाचून त्यावर आधारित शंभर असत्य पुस्तके येतात ,शंभराव्या पुस्तकाच्या मागे मागच्या नव्याण्णव  पुस्तकाचे संदर्भ असतात.नव्याण्णवावे पुस्तक वाचणाऱ्याला वाटते की केवढा मोठा व्यासंग आहे लेखकाचा 
    आउट ऑफ बॉक्स विचार करणे हे आपल्याला झेपत नाही .कारण तसा विचार केला तर आपला कम्फर्ट झोन तुटण्याची शक्यता असते.आयुष्यभर ज्यांचा राग केला अथवा ज्यांच्यावर प्रेम केल,त्यांच्याबद्दलचे वास्तव कळले की स्वतः केलेल्या चूका मान्य करणे अवघड जाते. म्हणूनच डावे आयुष्यभर डावे रहातात त्यांच्या दृष्टीने उजवे शत्रू असतात, उजवे आयुष्यभर उजवे रहातात त्यांच्या दृष्टीने डावे हे शत्रू असतात.असे उजवे आणि डावे कट्टर असणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली जाते.
      समाजात सरमिसळ असताना त्यात सर्वबाजुनी चांगल्या वाईटाची सर्व बाजूनी उलथापालथ होत असताना एकाच विचारांना चिकटून रहाणे, नायक आणि खलनायक अशी विभागणी करत रहाणे. एकांगी ग्रंथ निर्माण करणे,संघटना निर्माण करणे.आणि त्याचवेळी इतर विचारांना शत्रू समजणे,मनाची दारे बंद करणे, एकाच समुदायाला टार्गेट करणे हे हास्यास्पद नाही का? आणि या हास्यास्पद गोष्टी अभिमानाने मिरवणे हे त्याहूनही हास्यास्पद नाही का?
      मित्रांनो आपल्याला हव्या तशा पोस्ट कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड करणे सोपे असते.पण स्वतः लॉजिक वापरून चिंतन करणे खूप कठीण आणि चॅलेंजिंग असते.कितीही आवडता नेता असुदे ,लेखक असू दे,ग्रंथ असू दे त्याची चिकित्सा स्वतः करा..केवळ आपल्याला आवडणारे मटेरियल त्यात आहे .लिहिण्याऱ्याकडे सतराशे साठ डिगऱ्या आहेत..म्हणून ते स्वीकारू नका. पुस्तकातल्या प्रत्येक परिच्छेदाला थोडा विसावा घ्या ,लॉजिक लावा,नोटिंग करा.उलटे प्रश्न विचारा, ज्या काळाचा संदर्भ असेल तो लक्षात घ्या त्याची तुलना आजच्या वास्तवाशी करा. असे करत करत वाचन करा. पुस्तकाच्या मागे संदर्भ असेल तर तो क्रॉस चेक करा ,ती संदर्भिय पुस्तके वाचा...
    आता विचार करा ,आपण जे पोट भरण्यासाठी उद्योग करतो तो वेळ आणि आपला स्क्रीन टाइम यातून एवढ सगळं करायला वेळ मिळतो का?मग आपण काय करतो जे रेडिमेड असते आणि जे आवडते ते उचलतो आणि सोशल मीडियावर फेकून देतो ,मग त्यावर वाद -प्रतिवाद ,भांडण ..मित्र दुरावणे ..
     त्यापेक्षा शांत रहा.. सुकून ही सुकून..☺️☺️

-प्रशांत कलाकांत

No comments:

Post a Comment