Saturday 5 August 2023

नाती

नाती...

उंट शेवटच्या काडीने बसत नाही..शेवटची काडी ठेवण्या अगोदर अनेक असह्य ओझी त्याच्या पाठीवर ठेवलेली असतात ..नात्यांचे पण तसेच असते..नाती अचानक तुटत नाहीत , ती तुटायची सुरुवात कित्येक दिवस अगोदर झालेली असते..
     तसं पाहिलं तर प्रत्येक नात्याची एक टाइम लिमिट असते.त्याची सुद्धा एक एक्सपायरी डेट ठरलेली असते..आपल्याला ती वाचता येत नाही इतकंच..नाते नवीन असते तेव्हा ते एखाद्या हिरव्यागार रोपट्याप्रमाणे ताजे टवटवीत, हवेहवेसे असते कारण त्या रोपाला संवाद ,ओढ आणि वेळ याचे खतपाणी मिळत असते..ते एकदा कमी झाले की नात्यांचे रोप सुकत जाते..
   मग नाती केवळ निभावली जातात..नात्यात केवळ एक औपचारिकता शिल्लक राहते..सुकलेली फांदी जशी कडकन मोडते तशी ती नाती केव्हाही मोडून पडतात..एखादी घटना त्याला फक्त निमित्त ठरते..आपण फक्त त्या घटनेचा विचार करत बसतो..स्वतःला दोष देत कुढत बसतो ..खरा हिमनग पाण्याखाली असतो तो आपल्याला दिसतच नाही..नात्यातला ब्रेकप दुखावणारा असला तरी हे जग ..नातेसंबंध किती अशाश्वत आहे याचे ते एक प्रत्यंतर असते..एका अर्थाने पाश तुटत जातात ही गोष्ट चांगलीच नाही का ? या सगळ्या अशाश्वताचे ओझे घेऊन मोक्षाची वाट चालणे अवघडच होईल नाही तरी....होय ना?

-प्रशांत 😊

No comments:

Post a Comment