Monday 8 March 2021

लेख-फोन मॅनर्स

मॅनर्स म्हणजे काय भाऊ??? मॅनर्स म्हणजे लेटेस्ट डिझाइन किंवा फॅशनचे कपडे घालणे? महागडे कपडे घालणे? बॉलिवूड हॉलीवूड आपल्या गप्पात असणे..? महागडे मोबाईल हँडसेट वापरणे???आणि हे सगळे करून आपण मॉडर्न आहोत हे दाखवणे किंवा आपण काळाच्या बरोबर आहोत किंवा कसे पुढे आहोत ते दाखवणे?
     मोबाईल वरून आठवलं, बहुसंख्य मोबाईल वापरणाऱ्यांना फोन मॅनर्स नसतातच..
१. फोन आल्यानंतर ,तो त्वरित न उचलणे, किंवा नंबर बघून करू नंतर असा विचार करणे.फोन कोणाचाही असो तो पटकन उचलला पाहिजे.काही वेळा अर्जंट काम असू शकते.

२. काही वेळा आपण महत्वाच्या मिटिंग मध्ये असतो किंवा गाडीवर असतो अशावेळी कॉल बॅक करणे खूप गरजेचे असते. आणि असे कॉल बॅक करताना, सॉरी ह मी अमुक कारणा मुळे कॉल उचलू शकलो नाही, असे आवर्जून बोलावे,मग तो कॉल कोणीही केलेला असू दे.ऑफिसमधील बॉस असू देत अथवा शिपाई अगदी आपल्या घरातील छोटे मूल का असेना? असे बोलून तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढत असते.आणि असे जेव्हा तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत करता त्यावेळी त्या मुलाच्या नजरेत तुम्ही रिस्पेक्टड पर्सन होत असता.

३. फोन वर बोलताना कधी खोटं बोलू नये. कधी कधी ऑफिसच्या बॉस ला आपण रस्त्यात आहोत येतच आहोत असे सांगतो,नेमकं त्यावेळी कुकरच्या शिट्ट्या होतात.किंवा मी ऑफिसमध्ये आहे असे सांगितले तर समोरच्याला गाडीचे हॉर्न ऐकू जातात.एकदा तुम्ही खोटे बोललात की तुमची विश्वासार्हता कमी होते

४. ज्यावेळी आपण कॉल करतो त्यावेळी समोरच्या माणसाची स्थित्ती लक्षात घ्यावी.समोरची व्यक्ती बिझी आहे का? आता मी बोलू शकतो ना?अशी परवानगी घेऊनच संभाषण सुरू करावे? गृहिणींना सकाळच्या वेळी शक्यतो फोन करू नये त्या बिझी असतात,काही स्त्रिया आपण निवांत झालो की मैत्रिणींना फोन करत सुटतात, आपण फ्री झालो म्हणजे समोरची व्यक्ती  फ्री असेलच असे नाही ना..काही माणसांचा रात्रीचा जेवायची वेळ रात्री 10 आणि झोपायची वेळ 12 असते पण सगळ्ययांच्या वेळा तशाच असतील अस गृहीत धरून फोन केला जातो तेव्हा समोरचा माणूस गाढ झोपलेला असतो.तुम्ही जरी रात्री फोन केला असला तरी त्याच्या दृष्टीने ती अपरात्र असते.

५. बोलताना कमी शब्दात पण प्रभावी बोलावे.समोरच्या माणसाचे पूर्ण ऐकून त्यावर विचार केल्याशिवाय बोलू नये.समोरच्याचे बोलणे मध्येच तोडून आपले बोलणे त्यात घुसवू नये.विषयानुरूप नेमके बोलावे,फाफट पसारा लावून बोलू नये.आपल्या अनावश्यक बोलण्याने समोरच्या व्यक्तीला येणारे अर्जंट कॉल ती व्यक्ती घेऊ शकत नाही.

६. आपल्या घरात पाहुणे आले असतील तर आपल्याला येणारे कॉल कमीत कमी सभाषणाचे असतील याची दक्षता घ्यावी.तुमच्याकडे आलेला नातेवाईक, मित्र,मैत्रीण ही तुम्हाला भेटायला आलेली असते, तुमचे फोनवरच बोलणं ऐकायला नाही.घरात पाहुणे आल्यानंतर मोबाईल वर व्यस्त राहणे हे अडाणीपणाचे लक्षण आहे.

७. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वर बोलताना ,आर्थिक विषय बोलू नये,तसेच आपले पासवर्ड ,खाजगी गोष्टी इतरांना ऐकु जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

८.एखादी वाईट बातमी देताना,समोरची व्यक्ती जबाबदार आहे याची खात्री करून बातमी दयावी. या उलट आनंदाची बातमी देताना, शुभेच्छा देताना तुमचा आनंद तुमच्या शब्दातून कळला पाहिजे.कोरड्या शुभेच्छा लगेच समजतात.

९..दुचाकी वरून जाताना मोबाईल वर कधीही बोलू नये.वेळ सांगून येत नाही.

१०. काही वेळा आपल्याला  चुकून दुसरे कॉल येतात अशावेळी न रागावता सौम्य शब्दात wrong कॉल असल्याचे सांगावे.

११. मिसकॉल देण्याचा हलकटपणा कधीच करू नये.अपक्याला जर बोलायचे असेल तर सरळ कॉल करावा.असे पैसे वाचवून कोणी बंगला बांधल्याचे माझ्या पाहण्यात नाही

-प्रशांत शेलटकर
8600583846



No comments:

Post a Comment