Thursday 1 September 2022

देवा घरचे ज्ञात कुणाला?

देवा घरचे ज्ञात कुणाला?


मानवी मनातील भय या मूलभूत भावनेतून देव या संकल्पनेची निर्मिती झाली आणि त्याचा प्रवास आनंद निर्मितीचे साधन असा झाला. भयमुक्तीचे साधन म्हणून देवाकडे पाहिले जाते तसेच आनंद निर्मितीचे साधन म्हणूनही पाहिले जाते. मृत्यूचे भय ही अत्यन्त शाश्वत गोष्ट आहे. त्या भयातून मुक्त होण्यासाठी देव या संकल्पनेचा आधार वाटत आला आहे आणि राहील.व्यक्तिगत पातळीवरचे अनुभव माणसाला आस्तिक अथवा नास्तिक बनवतात. पराकोटीचे दुःख अनुभवाला आले माणूस नास्तिक बनण्याची शक्यता असते तसेच वैज्ञानिक निकषावर देवाचे अस्तित्व टिकत नाही म्हणून नास्तिक असलेले लोकही असतात. आयुष्यात मिळालेली सुरक्षा देवामुळेच मिळाली असेही मानणारे असतात.एकाच घटनेवर भिन्न असा प्रतिसाद असू शकतो. जवळची व्यक्ती गेली की देवावरचा विश्वास उडालेली माणसे पण असतात आणि ही देवाचीच इच्छा असे समजून पुढे जाणारे पण असतात. 
      देवामुळे मिळणाऱ्या आनंदाला मात्र कसलाच कार्य कारण भाव अथवा वैज्ञानिक निकष लावता येत नाहीत..बालपणी च्या आठवणींचे आपल्या आयुष्यात खूप महत्व असते.सण उत्सव यांच्या आनंदमय आठवणी मनात साठवल्या जातात. त्या रि-कॉल करणे माणसाला आवडते .दरवर्षी  येणारे सण माणसाला आनंदाचा पुनःप्रत्यय देतात. सणच कशाला आपण स्वातंत्र्यदिन तरी दरवर्षी का साजरा करतो? 15 ऑगस्ट 1947 साली झालेल्या आनंदाचा पुनःप्रत्यय असतो तो..
     भयमुक्तीचे की आनंदनिर्मितचे साधन म्हणून देवाकडे पहायचे की देवालाच बाद करून या विश्वाच्या पसऱ्याचे अवलोकन करत रहाणे हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न...आणि उत्तरही...

- टीप - मानवी मेंदूच्या क्षमतेच्या मर्यादेच्या अधीन राहून झालेले व्यक्तीगत आकलन.भविष्यात या मध्ये बदल होऊ शकतो किंवा होणार नाही.

- प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment