Saturday 20 August 2022

पंखात चोच घालून बसलेली माणसे...

पंखात चोच घालून बसलेली माणसे...

आपले कोणावाचून अडत नाही आणि आपल्यावाचून कोणाचे अडले नाही पाहिजे किंवा अडले पाहिजे  ही भावना नात्यात संघर्ष निर्माण करते. आपण पूर्णपणे स्वावलंबी आहोत हे खुळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे .आत्मनिर्भर हा शब्द कितीही गोंडस वाटला तरी वास्तवात माणूस परस्परनिर्भर असतो. 
      तरीही समाजापासून फटकून रहाणारी माणसे पाहिली की हे कोणी तरी अयोनीज अवतारी पुरुष असावेत अस वाटायला लागतं.. एकत्र येण्याकरता सण-समारंभ आणि गरज या दोनच गोष्टी का लागतात? आपण बरे आपले काम बरे या विधानाचे खूप उदात्तीकरण झालंय.. आपल्याच कोषात बंद राहण्यासाठी मनाला समर्थन देणारे वाक्य आहे हे..
  माणसं एकत्र का येत नाही हा एक अस्वस्थ करणारा प्रश्न  ..स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजणे आणि हे स्वतःचे वेगळेपण इतरांनी मान्य करीत राहील पाहिजे ही अपेक्षा समाजात मिसळण्या पासून परावृत्त करते का? दुसरी शक्यता अशीही असते . आपण समजा समाजात मिसळलो तर आपली वैगुण्ये इतरांना कळतील , आपले अज्ञान लोकांना कळेल त्या पेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची असेही असू शकते..
      माणसं स्वतःमध्ये गुरफटत जात आहेत.अफाट माहिती गोळा होत आहे. माणसं आपल्या बुद्धीला धार काढत बसलेली आहेत आणि कधी इतरांना कधी स्वतःला घायाळ करीत आहेत ...सगळं विचित्र आहे...

© प्रशांत शेलटकर
     8600583846

-

No comments:

Post a Comment